Monday, December 8, 2014

Mitra Bhed


मित्रभेद भाग - १


धन आहे तर सर्व आहे, धनाविना जीवन व्यर्थ आहे 
विष्णुशर्मा त्या तीन राजकुमारांना म्हणाला, 'तुम्ही राहात असलेल्या या महिलारोप्य नगरात फार वर्षापूर्वी 'वर्धमानक' नावाचा एक वैश्यपुत्र राहात होता. एके रात्री तो अंथरुणात पडला असता त्याच्या मनात विचार येऊ लागले, आपल्याला जरी पैशांची कमतरता नसली तरी, आहे या संपत्तीत समाधान मानण्यात काय अर्थ आहे ? म्हटलंच आहे ना?

न हि तद्विद्यते किंचिद्यदर्थेन न सिद्ध्यति ।
यत्नेन मतिमांस्तस्मादर्थमेकं प्रसाधयेत् ॥
(जे पैशानेही साध्य होत नाही, असे या जगात काहीही नाही. म्हणून बुद्धिवंताने प्रयत्न करून फक्त पैसाच मिळवावा.)
या पैशात केवढं प्रचंड सामर्थ्य आहे ?

यस्यार्थास्तस्य मित्राणि यश्यार्थास्तस्य बान्धवाः ।
यस्यार्थाः स पुमांल्लोके यस्यार्थाः स च पण्डितः ॥

(ज्याच्याकडे पैसा असतो त्याला मित्र असतात, ज्याच्यापाशी पैसा असतो त्याला नातेवाईक मिळतात, ज्याच्याजवळ पैसा असतो तोच या जगात श्रेष्ठ पुरुष मानला जातो आणि ज्याच्याकडे पैसा असतो तोच विद्वान म्हणून समजला जातो.)
त्याचप्रमाणे -

इह लोके हि धनिनां परोऽपि स्वजनायते ।
स्वजनोऽपि दरिद्राणां सर्वदा दुर्जनायते ॥
(या जगात श्रीमंत लोक जरी परके असले, जरी त्यांना आपले मानले जाते आणि दरिद्री जरी आपले नातेवाईक असले, तरी त्यांना वाईट समजून दूर लोटले जाते.) तसेच-
पूज्यते यदपूज्योऽपि यदगम्योऽपि गम्यते ।
वन्द्यते यदवन्द्योऽपि स प्रभावो धनस्य च ॥
(एखादा श्रीमंत माणूस अपूजनीय असला तरी त्याची पूजा केली जाते. ज्याच्याकडे चुकूनही जाऊ नये, असा जरी तो असला तरी त्याच्याकडे जाणे योग्य ठरते, आणि तो वंदन करण्याच्या दृष्टीने कितीही अपात्र असला तरी त्याला वंदन केले जाते.) शिवाय -

गतवयसामपि पुंसां येषामर्था भवन्ति ते तरुणाः ।
अर्थेन तु ये हीना वृद्धास्ते यौवनेऽपि स्युः ॥
(ज्यांच्यापाशी धन आहे अशी माणसे तरुंणासारखी वागतात, तर धनहीन तरुण असले तरीही ते वृद्धांसारखे वागतात. )
पण ती संपत्ती कोणत्या त-हेने मिळवायची ? कारण, संपत्ती मिळवायचे एकूण सहा मार्ग आहेत.

१) भिक्षा मागणे
२) राजाची सेवा
३) शेती,
४) विद्यादान 
५) सावकारी, 
६) व्यापार. 

त्यापैकी भीक मागून धन मिळविणे हे लाजिरवाणे असते. राजाची सेवा तशी वाईट नसते, पण त्याची मर्जी केव्हा फिरेल याची शाश्वती नसते. शेती पिकणं न पिकणं, हे सर्वस्वी पावसाच्या लहरीवर अवलंबून असतं. विद्यादान करणे चांगले, पण विद्यार्थी जे काही त्यांच्या इच्छेला येईल तो गुरूला देत असल्याने, त्या अल्पस्वल्प उत्पन्नावर गुरूला आपले आयुष्य बहुधा दारिद्र्यातच घालवावे लागते. सावकारीत शरीराला कष्ट कमी, पण सावकाराचा पैसा कर्ज म्हणून दुसऱ्याच्या हाती जातो आणि त्या ऋणकोने हात वर केले की, धनको पार बुडून जातो. त्या दृष्टीने व्यापार हाच सर्वात उत्तम. त्यातून इथल्या वस्तू बाहेरगावी व बाहेरगावच्या वस्तू इथे आणून विकण्याचा व्यापार तर फारच फायदेशीर.

मनात हा विचार येताच, त्या वर्धमानाने आपल्या गावात निर्माण होणाऱ्या वस्तु मथुरेस, व मथुरेस तयार होणाऱ्या वस्तू आपल्या गावी आणून विकण्याचे ठरविले. त्याप्रमाणे आपल्या गाडीला संजीवक व नंदक नावाचे दोन बैल जुंपून, विकावयाचा माल गाडीत भरपूर भरून, व बरोबर दोन-तीन सेवक घेऊन तो नजिकच्या शुभ मुहूर्तावर मथुरेच्या मार्गाला लागला.
वाटेत लागलेल्या घनदाट वनातून वाहणाऱ्या यमुना नदीच्या काठाकाठाने बैलगाडी चालली असता, तिला जुंपलेल्या संजीवक बैलाचा पाय मुरगळला. त्याला पुढे चालणे अशक्य झाले. मग वर्धमानाने आपल्या दोन सेवकांना त्या बैलाच्या सेवेसाठी मागे ठेवले आणि जवळच्याच एका गावातून एका नवा बैल विकत घेऊन त्याला गाडीला जुंपले, व उरलेल्या सेवकासह त्याने मथुरेस प्रयाण केले.

त्याने मागे ठेवलेले दोन सेवक जेमतेम दोन दिवस त्या संजीवक बैलाची सेवा करीत राहिले, पण 'वाघ-सिंहानी भरलेल्या या अरण्यात राहणे धोक्याचे आहे,' असा विचार करून, ते सेवक, त्या बैलाला तसाच सोडून धन्याला गाठण्याकरिता मथुरेस गेले व त्याला खोटेच म्हणाले, 'धनी, आपला संजीवक बैल कैलासवासी झाला. तो आपला अतिशय लाडका असल्याने, आम्ही त्याला विधियुक्त अग्नी दिला.' परंतु शुद्ध हवा, पाणी आणि पाचूसारखा हिरवेगार कोवळे गवत मिळाल्यामुळे, संजीवक थोड्याच दिवसात पूर्ण बरा झाला व इकडे तिकडे फिरू लागला. त्याची प्रकृतीही चांगली धष्टपुष्ट झाली. म्हटलंच आहे ना ? -

अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं सुरक्षितं दैवहतं विनश्यति।
जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः कृतप्रयत्नोऽपि गृहे विनश्यति ॥
(दैवानेच ज्याचे रक्षण केले आहे, असा एखादा जरी रक्षणरहित असला, तरी तो सुरक्षित राहतो आणि ज्याच्यावर दैवच उलटले आहे, असा एखादा कितीही जरी रक्षणात असला तरी तो नाश पावतो. तसेच वनात सोडून दिलेला एखादा अनाथ प्राणी जिवंत राहतो आणि जो जगावा म्हणून प्रयत्नांची शर्थ चालू असते, असा घरात असलेला माणूस मरून जातो !)

अशा तऱ्हेने काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी त्या वनाचा राजा पिंगलक सिंह हा पाणी पिण्यासाठी यमुनातीरी चालला असता, त्याच्या कानी संजीवक बैलाची डुरकाळी पडली. पिंगलकाने आयुष्यात कधी बैल पाहिलेला नसल्याने, किंवा त्याची डरकाळीही ऐकलेली नसल्याने, तो आवाज कानी पडताच तो घाबरला व पाणी न पिताच दूरच्या एका वडाच्या बुंध्यापाशी आपल्याभोवती मंत्र्यांचे व अनुयायांचे संरक्षक कोंडाळे करून घेऊन बसला.

पिंगलक सिंहाच्या एकेकाळच्या मंत्री असलेल्या एका कोल्ह्याला करटक व दमनक नावाचे दोन मुलगे होते. ते दोघेही पित्याच्या पश्चात पिंगलकाचे मंत्री बनले होते, पण पिंगलकाने त्यांना - काही कारणास्तव - मंत्रीपदावरून दूर केले होते. यमुनेवर गेलेला आपला राजा, हा पाणी न पिताच भयभीत मनःस्थितीत वटवृक्षाकडे परत गेल्याचे पाहून दमनक करटकाला म्हणाला, 'दादा, पिंगलकमहाराज पाणी न पिताच भयग्रस्त मनःस्थितीत का बरं परतले ? आपण त्यांच्याकडे चौकशी करून येता का?'
करटक म्हणाला, 'बाबा रे, आपल्याला या नसत्या उठाठेवी हव्यात कशाला ? करवतीने अर्धवट कापलेल्या लाकडात सुतारांनी ठोकलेली पाचर कारण नसता काढायला गेलेल्या त्या वानराची गत काय झाली, ते तुला ठाऊक आहे ना ?'
'ती गोष्ट काय आहे?' असे दमनकाने विचारताच करटक सांगू लागला
 . . .
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


मित्रभेद भाग - २  
'नसती उठाठेव जो करी, तो संकटाला आपणहून पाचारी'
'एका नगरात सीमेवरील उपवनात एक धनिक मंदिर बांधून घेत होता. त्या कामावर असलेले सुतार, गवंडी आदि कामगार, सूर्य डोक्यावर येताच काम थांबवून आपापल्या घरी जेवायला जात.

एकदा त्या मंदिराच्या तुळया तयार करण्याकरिता सुतार अर्जुनवृक्षाचे एक जाड व लांब लाकूड करवतीने चिरत होते. ते लाकूड अर्धवट चिरून होते न होते, तोच उन्हे उभावल्यामुळे सुतार त्या अर्धवट चिरलेल्या लाकडात खैराची पाचर ठोकून, इतर कामगारांसंगे जेवायला घरी गेले. ते घरी गेले आणि लगेच पाच-पंचवीस वानरांचे एक टोळके त्या ठिकाणी येऊन नाना तऱ्हेच्या चेष्टा, चाळे करू लागले.

कुणी दगडांच्या राशीतले दगड फेकतोय, तर कुणी हातोड्याने ठाकठोक करतोय, असे त्यांचे चाळे सुरू झाले असता, नसते उपद्व्याप करण्याची खोड असलेला एक जाडगेला वानर त्या अर्धवट चिरलेल्या लाकडावर जाऊन बसला, व त्या चिरलेल्या भागात सुताराने ठोकलेली पाचर ओढून काढू लागला. असे करीत असता, त्याची शेपटी, वृषण आदि अवयव अजाणता त्या दुभंगलेल्या लाकडाच्या फटीत गेले आणि ती पाचर काढली जाताच ते लाकडाचे दोन भाग एकदम एकत्र आल्याने त्यांत ते अवयव चिरडले गेले व त्याला यातना सोशीत प्राणांना मुकावे लागले. म्हणून मी म्हणतो, 'हे दमनका, तू नसत्या उठाठेवीत पडू नकोस.'

यावर दमनक नाक मुरडून म्हणाला, 'दादा, मग काय आपण आपलं पुढलं आयुष्य केवळ स्वतःचं पोट भरण्यातच घालवायचं ? छे छे ! आज जरी आपल्याला राजाश्रय नसला, तरि मित्रांना वर आणण्याकरिता व शत्रूंना खाली दडपण्याकरिता आपण पुन्हा राजाश्रय मिळवलाच पाहिजे. सध्याच्या आपल्या चैतन्यहीन आयुष्याला काहीतरी अर्थ आहे का ? म्हटलंच आहे ना ?
यस्मिन जीवति जीवन्ति बहवः सोऽत्र जीवति ।
वायाम्सि किं न किर्वन्ति चंच्वा स्वोदरपूरणम् ॥
(ज्याच्या जगण्यामुळे या जगात अनेकजण जगतात, तोच खऱ्या अर्थी जगतो. नाहीतर कावळेसुद्धा आपल्या चोचीने स्वतःचे पोट भरतातच ना ?)

'तेव्हा दादा, मी पिंगलकमहाराजांकडे जाणार आणि त्यांना त्यांच्या भीतीचे कारण विचारून व शक्य झाल्यास ते कारण दूर करून, त्यांचे व आपले दुरावलेले संबंध पुन्हा जोडणार.' करटकाने विचारले, 'पण दमनका, बोलावले नसतानाही जो राजाकडे जातो, तो बऱ्याच वेळा इतरांच्या कुचेष्टेचा विषय होतो, हे तुला ठाऊक आहे ना ?'

दमनक म्हणाला, 'दादा, नसत्या अभिमानाला बळी पडून जे लोक राजापासून दूर राहतात ते आयुष्यभर अर्धपोटी राहतात. ज्याप्रमाणे चंदनवृक्ष हा मलय पर्वताखेरीज इतरत्र कुठे वाढत नाही, त्याचप्रमाणे विद्वान, गुणवान्, कलावंत व शूर यांच्या गुणांचे चीज राजाच्या आश्रयाखेरीज होत नाही. आता तू विचारशील की, आपण कुठे तसे मोठे आहोत ? पण आपण जरी सामान्य असलो, तरीही राजाच्या आश्रयाला जावे. कारण म्हटलेच आहे ना ?
आसन्नमेव नृपतिर्भजते मनुष्यं ।
विद्याविहीनमकुलीनमसंस्कृतं वा ।
प्रायेण भूमिपतयः प्रमदा लताश्च ।
यत्पार्श्वतो भवति तत्परिवेष्टयन्ति ॥
(जो मनुष्य जवळपास असतो, तो जरी विद्याहीन, अकुलीन किंवा असंस्कृत असला, तरी राजा त्याच्यावर कृपा करतो. राजे, स्त्रिया व वेली या बहुधा जो जवळ असतो त्याचाच आधार घेतात.)

याप्रमाणे बोलून दमनक हा जेव्हा पिंगलकाकडे गेला व त्याला म्दन करून त्याच्यापुढे नम्रपणे उभा राहिला, तेव्हा पिंगलकाने त्याला विचारले, 'काय रे दमनका, तू बऱ्याच दिवसांत माझ्याकडे फिरकला कसा काय नाहीस ?' दमनक म्हणाला, 'महाराज, आपल्याला जर आमच्यासारख्या सामान्यांची गरज उरली नाही, तर उगाच यायचे कशाला ? पण एक गोष्ट मात्र निश्चित - आपण आम्हाला विचारा वा न विचारा, आमचे आपल्यावरचे प्रेम कधी कमी व्हायचे नाही, आणि आम्हाला जे योग्य वाटेल ते आपल्यासमोर बोलायला आम्ही कचरणारही नाही.' 'त्यातून महाराज, राजा जर सेवकावर प्रसन्न झाला, तर तो फार तर त्याला कमीअधिक धन देतो, पण निष्ठावंत सेवक जर राजावर प्रसन्न झाला, तर तो त्याच्यासाठी आपला प्राणही द्यायला तयार होतो. आता इतर मंत्र्यांच्या तुलनेत मी व माझा भाऊ करटक आपल्याला यःकश्चित् वाटत असलो, तरीही आपण माझे म्हणणे ऐकून घ्यावे.'

'महाराज, यःकश्चित् गोष्टींकडेसुद्धा दुर्लक्ष करू नये. त्यासुद्धा वाटतात तशा निरुपयोगी नसतात. साध्या काडीचासुद्धा दात व कान कोरण्यासाठी उपयोग होतोच ना ? मौल्यवान रेशीम यःकश्चित् किड्यांपासूनच मिळते ना ? प्रत्यक्ष देवसुद्धा ज्यांना मस्तकी धारण करतात, ती कमळे चिखलापासूनच मिळतात ना ? सोनेसुद्धा दगड मातीतूनच प्राप्त होते ना ? तेव्हा भोवतालच्या लोकांचे नुसते कूळ वा बुद्धी विचारात न घेता, त्यांची निष्ठाच अधिक विचारात घ्यावी. तेव्हा, आम्हा दोघां भावांसारखे मर्यादित बुद्धीचे पण अमर्याद निष्ठेचे सेवकच आपल्याला अधिक उपयोगी पडतील, ही गोष्ट महाराजांनी लक्षात असू द्यावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे.'

पिंगलक हसून म्हणाला, 'दमनका, तुझे आताचे बोलणेच मुळी तू सामान्य बुद्धीचा नाहीस हे सिद्ध करते. त्यातून तू व तुझा भाऊ करटक हे माझ्या एकेकाळच्या मंत्र्याचे मुलगे, तेव्हा मी तुम्हा दोघांना तसे परके कसे मानीन ? पण या घडीला त्या इतर गोष्टी बाजूला ठेवून, तू माझ्याकडे कशासाठी आला आहेस, तेवढेच मला सांग.' दमनक म्हणाला, 'काही गोष्टी सर्वांसमक्ष बोलायच्या नसतात.' त्याचे हे बोलणे ऐकून राजा पिंगलकाभोवती असलेले सर्व प्राणी दूर जाताच दमनकाने विचारले, 'महाराज, आपण पाणी पिण्याच्या उद्देशाने यमुनाकाठी गेला असता, पाणी न पिताच काहीशा भयभीत मनःस्थितीत इकडे का परतलात?'
सुरुवातीला थोडेसे आढेवेढे घेऊन राजा पिंगलक म्हणाला, 'दमनका, मी सांगतो आहे त्याची कुठे वाच्यता करू नकोस. अरे, मी यमुनेवर पाणी प्यायला गेलो असता, काळजाचा थरकाप उडवणारी एक डरकाळी माझ्या कानी पडली. ती ऐकून, ती एखाद्या, महाभयंकर प्राण्याची असावी, असे वाटून मी पाणी न पिताच इकडे परतलो व हे रान सोडून दुसऱ्या एखाद्या दूरच्या रानात जाण्यचा विचार मी करू लागलो.'

यावर दमनक म्हणाला, 'महाराज, नुसत्या मोठ्या आवाजामुळे धास्तावून जाणे योग्य नाही. तसा मोठा आवाज नगारा, नौबत किंवा शंख यांचाही होतो. अशाच एका नगा-याच्या आवाजाला भ्यायलेल्या आमच्या एका जातभाईचे, नंतर कसे डोळे उघडले, ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे का?' पिंगलकाने नाही असे उत्तर देताच दमनक म्हणाला, 'तर मग ऐका महाराज . . .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 


 मित्रभेद भाग - ३
'नको तिथे भितो, तो हसे करून घेतो.'
गोमायु नावाचा एक कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ वनात भटकत असता, त्याच्या कानी अधुनमधून एक भयंकर आवाज पडू लागला. प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती की, एके ठिकाणी कुणाच्यातरी राहून गेलेल्या नगा-यावर वा-याच्या झुळकेसरशी एका झुडपाच्या फांदीचा अधुनमधून आघात होत होता व त्यामुळे त्या नगा-यातून 'धाडधूम्' असा ध्वनी बाहेर पडत होता.
पण तो आवाज ऐकून तो कोल्हा अतिशय घाबरला व ते वन सोडून जाण्याचा विचार करू लागला. परंतु लगेच त्याच्या मनात विचार आला, हा भयंकर आवाज काढणारा प्राणी आहे तरी कोण, ते अगोदर सुरक्षित अंतरावरून पाहावे, आणि मगच हे वन सोडून जायचे की नाही ते ठरवावे.

मनात असा विचार करून तो त्या आवाजाच्या रोखाने जरा पुढे जातो न जातो, तोच त्याला फांदीच्या आघातांमुळे आवाज करणारा तो नगारा दिसला. ती एक निर्जीव वस्तू असल्याचे लक्षात येताच, तो त्या नगा-याजवळ गेला व स्वतःशीच म्हणाला, 'मी उगाच या आवाजाला भ्यायलो. हे एक पोकळ लाकडी भांडे असून, हे बहुधा चमचमीत खाद्यपदार्थांनी भरलेले असावे, म्हणूनच याचे वरचे तोंड चामड्याने पक्के बंद करून टाकले असावे.

या विचारामुळे त्याला आनंद झाला आणि त्या भांड्यातील ते रुचकर पदार्थ खाण्याच्या हेतूने, त्याने त्या नगा-याचे कातडे दाताने कुरतडले व तो त्याच्या आत काय काय आहे ते पाहू लागला. पण आत पाहतो तर केवळ पोकळी ! त्यामुळे निराश झालेला तो स्वतःशी म्हणाला -
भये वा यदि वा हर्षे संप्राप्ते यो विमर्शयेत् ।
कृत्यं न कुरुते वेगान्न स सन्तापमाप्नुयात् ॥
(भयाचा प्रसंग असो वा आनंदाचा प्रसंग असो, जो विचाराने वागतो, व कुठलीही गोष्ट उतावीळेपणाने करीत नाही, त्याच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.)

दमनकाने ही गोष्ट सांगताच राजा पिंगलक त्याला म्हणाला, 'तुझ्या गोष्टीचा मतितार्थ मला कळला. पण समजा, ती भयंकर डुरकाळी एखाद्या महाभयंकर प्राण्याची असली तर ? मी वनराज सिंह असलो तरी आता वृद्ध झालो असल्याने, माझ्यात आता पूर्वीचे बळ राहिले नाही. तेव्हा मी त्याच्याकडे कसा जाऊ?' दमनक म्हणाला, 'महाराज, माझ्यासारखा निष्ठावंत सेवक आपल्या सेवेला हजर असताना, आपण त्या प्राण्याकडे जाण्याचं काय कारण ? आपली आज्ञा झाल्यास, मी त्या प्राण्याकडे जातो आणि त्याची माहिती काढून येतो. त्याच्याकडे जाऊन आल्यावर पुढं काय करायचं ते मी सांगेन.'

'तू खरोखरच त्याच्याकडे जाशील का ?' अशा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक म्हणाला, 'महाराज, हा काय प्रश्न झाला ? माझ्यासारखा निष्ठावंत सेवक स्वामींसाठी वाटेल ते करायला तयार होईल. चांगल्या सेवकाचं लक्षणच मुळी असं आहे की-
स्वाम्यादेशात् सुभृत्यस्य न भीः संजायते क्वचित् ।
प्रविशेत् मुखमाहेयं दुस्तरं वा महार्णवम् ॥
(स्वामीने आज्ञा केली तर चांगला सेवक हा कधीही भीत नाही. तो सर्पाच्या जबड्यातसुद्धा शिरेल, किंवा प्रसंग पडल्यास महासागरातही उडी घेईल. )

दमनकाच्या या बोलण्याने संतुष्ट झालेल्या राजा पिंगलकाने, 'तू आपल्या कामात यशस्वी हो,' अशी त्याला शुभेच्छा व्यक्त करताच दमनक त्या 'भयंकर' प्राण्याच्या शोधार्थ निघाला व थोड्याच वेळात तो संजीवक बैल त्याच्या दृष्टीस पडला. त्याबरोबर तो स्वतःशीच हसून म्हणाला, हात्तिच्या ! हा तर एक साधा बैल आहे ! पण पिंगलक महाराजांनी आयुष्यात कधीही बैल पाहिलेला किंवा त्याचा आवाज ऐकलेला नसल्याने, याचीच डुरकाळी ऐकून स्वारीची तारांबळ उडाली असली पाहिजे. आता तोच त्यांचा समज कायम ठेवून, आपण आपल्या फायद्यासाठी या बैलात व त्यांच्यात आपल्या गरजेनुसार मैत्री किंवा तंटा निर्माण केला पाहिजे, तरच हे दोघे आपल्या शब्दांत राहतील. नाहीतरी राजेलोक हे काही एखाद्याचे सद्गुण वा त्याचे कुळ पाहून त्याला मान देत नाहीत. त्यांना ज्याची गरज असते, त्याचीच ते दखल घेतात. बाकी तेही साहजिकच आहे.

ज्याचं आरोग्य उत्तम आहे, तो वैद्याची विचारपूस कशाला करील?' मनाशी असे ठरवून, दमनक पिंगलकाकडे गेला. त्याला पाहून पिंगलकाने विचारले, 'दमनका, खरं सांग, तुझ्या कामात तू यश मिळवलंस का?' दमनक म्हणाला, 'महाराज, आपल्याशी मी खोटं कसं बोलेन ? अहो, देवापाशी खोटं बोललं तर त्याबद्दलची शिक्षा पुढल्या जन्मी मिळते, पण राजाजवळ खोटं बोललं तर त्याची शिक्षा याच जन्मी वाट्याला येते. तेव्हा खरं सांगायचं तर तुम्ही सांगितलेल्या मोठ्या कामगिरीचा पहिला टप्पा मी पूर्ण केला. या वेळेला मी फक्त त्या प्राण्याला दुरून पाहिले. तो खरोखरच भयंकर दिसतोय. तरीही आपली आज्ञा झाली, तर मी त्याला आपला सेवक बनवू शकेन.'

'पण तो प्राणी माझा सेवक बनायला तयार होईल?' असा प्रश्न पिंगलकाने केला असता, दमनक म्हणाला, 'महाराज, जी बुद्धीलाही करता येणे अशक्य आहे, अशी एखादी तरी गोष्ट या जगात आहे का? म्हटलंच आहे-
न तच्छस्त्रैर्ननागेर्न्द्रैर्न हयैर्न पदातिभिः ।
कार्यं संसिद्धिमभ्येति यथा बुद्द्ध्या प्रसाधितम् ॥
(एखादी गोष्ट बुद्धीच्या सामर्थ्यावर जशी प्राप्त करून घेता येते, तशी ती शस्त्रे, हत्ती, घोडे व सैनिक यांच्या सहाय्यानेही साध्य करून घेता येत नाही. )

दमनकाच्या या बोलण्याने त्याच्यावर खूष झालेला पिंगलक त्याला म्हणाला, 'दमनका, आतापासून मी तुला पुन्हा माझा मंत्री बनविले आहे. यापुढे कुणाचा गौरव करायचा व कुणाला शिक्षा द्यायची, त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार मी तुला बहाल करीत आहे. तेव्हा आता तू माझा मंत्री म्हणून त्या प्राण्याकडे जा, त्याला मी अभय दिले असल्याचे सांग आणि त्याच्याकडूनही मला अभय असल्याचे वचन मिळवून, मग तू त्याला घेऊन माझ्याकडे.'

मंत्रीपद मिळाल्याने आनंदित झालेला दमनक त्या संजीवक बैलाकडे गेला आणि त्याला दटावणीच्या सुरात म्हणाला, 'कोण रे तू? आणि या वनाचे राजे असलेले महापराक्रमी पिंगलकमहाराज, यांच्या अनुज्ञेशिवाय तू या वनात स्वच्छंदपणे फिरून चारा खातोस ? त्यांच्यासारख्या सिंहश्रेष्ठाने मनात आणले, तर ते क्षणात तुझी चटणी करून टाकतील, तेव्हा तू माझ्यासंगे त्यांची क्षमा मागायला चल.'

'वनराज सिंहाकडे जाणे म्हणजे त्याचे भक्ष्य होणे,' हा विचार मनात येताच संजीवक बैल हादरून दमनकाला म्हणाला, 'कोल्होबा, कृपा करा आणि पिंगलकमहाराज या संजीवकाला मारणार नाहीत असे काहीतरी करा.'
दमनक मनात म्हणाला, 'सध्या हा व पिंगलक यांच्यात मैत्री घडवून आणायला हरकत नाहीत. त्यामुळे हे दोघेही परस्परांच्या भीतीपोटी माझ्याशी चांगले वागत राहतील.'

इकडे दमनकाच्या मनात असा विचार चालला असता, तिकडे पिंगलकाच्या मनात संशयाचे वेगळेच भूत थैमान घालू लागले होते. तो स्वतःशीच म्हणाला, 'या दमनकाला आपण मागे मंत्रीपदावरून काढून टाकले होते. त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्या भयंकर प्राण्याकरवी हा आपला काटा तर नाही ना काढणार ? वास्तविक त्याच्यावर विश्वास टाकून, आपण आपल्या मनातली भीती त्याच्यापुढे उघड करायला नको होती. म्हटलंच आहे ना?
न वध्यन्ते ह्यविश्वस्ता बलिभिर्दुबला अपि ।
विश्वस्तारस्त्वैव वध्यन्ते बलवन्तोऽपि दुर्बलैः ॥

(अवाजवी विश्वास न टाकणा-या दुर्बलांचा बलवानही घात करू शकत नाहीत, पण तसा विश्वास टाकणा-या बलवंतांचा दुर्बलांकडूनसुद्धा घात केला जातो.)

वनराज पिंगलकाच्या मनात असा संशय उत्पन्न झाल्यामुळे तो त्या वडाच्या झाडाखालून उठून, पलायनाच्या दृष्टीने सोयीच्या अशा दुस-या झाडाखाली जाऊन बसला व संकट ओढवलेच तर काय करायचे, याचा विचार करू लागला.

तिकडे दमनक संजीवकाला म्हणाला, 'हे बघ, वास्तविक आमचे पिंगलकमहाराज हे प्रत्यक्ष चंडिकादेवीचे वाहन असल्यामुळे, त्यांना कुणाचीच गरज नाही. असे असूनही मी तुला त्यांच्याकडून अभय मिळवून देईन व तुझी त्यांची मैत्री जुळवीन. पण माझे जे तुझ्यावर उपकार होतील, त्यांची तू जाणीव मात्र ठेव. यापुढे आपण दोघे जर एकमेकांचा सल्ला घेऊन वागलो, तर दोघांनाही सुखात दिवस काढता येतील.'

संजीवकाने हे मान्य करताच, दमनकाने त्याला तिथेच तात्पुरते थांबायला सांगून, तो पिंगलकाकडे गेला व त्याला भिवविण्यासाठी म्हणाला, 'महाराज, तो प्राणी असा तसा नाही. प्रत्यक्ष भगवान् महादेवाचे तो वाहन असल्यामुळे त्याला कुणाचीच गरज नाही. त्यामुळे सुरुवातीला तो माझे म्हणणेही ऐकून घ्यायला तयार नव्हता. पण 'पिंगलकमहाराज हे तर प्रत्यक्ष पार्वतीदेवीचे वाहन आहेत, असे मी त्याला खोटेच सांगितले, त्यामुळे तो आपल्याशी मैत्री करायला तयार झाला. मग घेऊन येऊ का इकडे त्याला ?' दमनकाच्या या बोलण्याने मनातला संशय दूर होऊन पिंगलक त्याला म्हणाला, 'शाब्बास तुझी ! खरा बुद्धिवान आहेस तू. म्हटलंच आहे ना?
मन्त्रिणां भिन्नसन्धाने भिषजां सन्निपातिके ।
कर्मणि व्यज्यते प्रज्ञा स्वस्थे को वा न पण्डितः ॥
(अनपेक्षित प्रसंग ओढवले असता मंत्र्यांच्या बुद्धीची आणि मोठ्या दुखण्यात वैद्यांच्या बुद्धीची परीक्षा होते. खरी बुद्धिमत्ता ही बिकट प्रसंगीच प्रकट होते. सर्व ठीक असताना कोण विद्वान नसतो ?)

मग पुन्हा पिंगलकाची परवानगी घेऊन दमनक संजीवकाकडे गेला व त्याला म्हणाला, 'मित्रा, मी माझे कौशल्य पणाला लावले आणि तुझ्यात व महाराजांच्यामधे मैत्रीचे संबध जुळवून आणले. तेव्हा तू निःशंकपणे माझ्यासंगे त्यांच्याकडे चल. पण महाराजांशी मैत्री जुळली, तरी मला मात्र विसरू नकोस. मी कोल्हा म्हणून मला क्षुद्र समजू नकोस. क्षुद्रांमध्येही थोरामोठ्यांना त्रास देण्याचे सामर्थ्य असते. म्हणून तर एका राजाच्या एका क्षुद्र हुज-याने त्या दंतिल सावकाराची हबेलंडी उडवली ना?'
'ती गोष्ट काय आहे?' असे संजीवकाने विचारताच दमनक म्हणाला, 'त्याचं असं झालं  . . .



मित्रभेद भाग - ४

क्षुद्र पेटता सूडाला, भारी पडे समर्थाला !
वर्धमान नावाच्या नगरीत दंतिल नावाचा एक श्रीमंत सावकार राहात होता. त्याच्या प्रेमळ व परोपकारी स्वभावामुळे, त्याला प्रजा व राजा या दोघांतही मानाचे स्थान होते. एकदा दंतिलाने त्याच्या घरी असलेल्या लग्नाच्या निमित्ताने, जसे इतर लोकांना भोजनाचे निमंत्रण केले, तसेच त्याने राजालाही त्याच्या परिवारासह जेवायला बोलावले.

ठरलेल्या दिवशी व वेळी राजा, राणी, त्यांचे खास अधिकारी, त्याचप्रमाणे दासदासी अशी सर्व मंडळी, त्या सावकाराकडे आली व त्याचे स्वागत स्वीकारून, त्यांच्यासाठी खास राखून ठेवलेल्या वेगवेगळ्या दालनांतील पानांवर आपापल्या दर्जाप्रमाणे बसू लागली. त्यांच्यात राजाचा गोरंभ नावाचा एक हुज होता. तो राजा व राजघराण्यातील माणसे यांच्यासाठी वाढून ठेवलेल्या पानांपैकी, एका पानावर बसू लागला होता, दंतिलाने त्याला तिथून हुसकून लावले. या अपमानाने तो हुज-या रागावून निघून गेला.

गोरंभ राजवाड्यावर निघून गेला खरा, पण त्याला चैन पडेना. तो मनात म्हणाला, 'मी एक यकःश्चित्त नोकर. त्या दंतिलशेटने माझ्या केलेल्या अपमानाचा सूड मी कसा काय घेऊ शकणार ? चूलखंडावरच्या कढईत भाजून निघणा-या हरभ-यांनी रागाच्या भरात कितीही जरी फडफडाट केला, तरी त्यामुळे कढई कधी फुटते का ? त्याचप्रमाणे दुर्बलांनी अपमानाचे कडू घोट निमूटपणे गिळायचे असतात.' पण या विचाराने त्याची समजूत पटेना. अखेर त्याला एक युक्ती सुचली.

दोन-तीन दिवसानंतरच्या एका सकाळी, तो राजाच्या शयनमहालाच्या दरवाजाबाहेर बसला होता. राजा आता अर्धवट जागा झाला असून, तो पलंगावरून उठण्याची हालचाल करीत आहे, अशी त्याला चाहूल लागली. तोच राजाला ऐकू जाईल अशा स्वरात तो मुद्दाम म्हणाला, 'कमाल आहे त्या दंतिलशेठची ! आपण महाराजांचे सच्चे मित्र आहोत असे वरपांगी त्यांना भासवतो, पण राजवाड्यात येऊन मात्र संधी सापडताच राणीसाहेबांना आलिंगने देतो. आणि अशा त्या कपटी दंतिलाला महाराजांनी मान द्यावा ?'

गोरंभाच्या तोंडची ही वाक्ये ऐकून राजा रागानं लालबुंद होऊन पलंगावरून उठला व गोरंभाला म्हणाला, 'काय रे, तो कपटी दंतिलशेठ राजवाड्यात येऊन राणीसाहेबांना खरोखरच आलिंगने देतो काय? अरे गप्प का राहिलास ? तूच तर नुकतंच तसं म्हणालास ना?' मनात ठरवून ठेवल्याप्रमाणे गोरंभाने उत्तर दिले, 'महाराज, असं कसं होईल ? काल रात्री मी ब-याच उशिरापर्यंत द्यूत खेळत बसलो होतो. त्यामुळे पहारा करता करता जरासा पेंगलो व त्या झोपेत भलतेच बोलून गेलो.'

पण गोरंभाच्या या खुलाशाने राजाचे समाधान झाले नाही. त्याला सारखे वाटू लागले, गोरंभाने ही गोष्ट प्रत्यक्ष पाहिली असावी व जागेपणी जे दिसते ते झोपेत तोंडावाटे बाहेर पडते, या नियमानुसार त्याच्या तोंडातून ती गोष्ट बाहेर पडली असावी. राजाच्या मनाने असे घेतले व म्हणून त्याने दंतिलाला राजवाड्यात प्रवेश न करू देण्याचे द्वारपालांना फर्मान सोडले. दंतिलाला या गोष्टीची कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे राजाच्या भेटीसाठी राजवाड्यावर गेला असता, द्वारपालांनी त्याला अडविले. 'महाराजांचा माझ्यावर असा कोप का बरं झाला?' असा प्रश्न दंतिलाने त्या द्वारपालांना विचारला असता, जवळच उभा असलेला गोरंभ म्हणाला, 'दंतिलशेट, करावे तसे भरावे. त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या घरी जेवायला आलो असता, पानावरून उठवून हुसकून लावले होते ना? आज महाराजांनी तुम्हाला हुसकावून देण्याचा हुकूम आम्हा सेवकांना सोडला आहे.'

हे उत्तर ऐकून दंतिलशेट खिन्न मनाने घरी परतला. राजाचे कान त्या गोरंभानेच फुंकले असले पाहिजेत, हे त्याने ओळखले. मग त्याला आपल्या घरी बोलावून व मनाविरुद्ध का होईना, त्याला ब-याच सुवर्णमोहरा व उंची वस्त्रे देऊन त्याने त्याची समजूत घातली व विचारले, 'गोरंभा, आता तरी तुझा राग गेला ना?' यावर गोरंभ म्हणाला, 'शेट, माझा राग तर गेलाच, पण चार-दोन दिवसांत राजेसाहेबांचाही तुमच्यावरचा राग दूर होईल असे मी करतो व त्यांचे -तुमचे स्नेहसंबंध पूर्ववत् जोडून देतो.'
त्याप्रमाणे दुस-याच दिवशी सकाळी, राजा अर्धवट जागा झाल्याची चाहूल लागताच, त्याच्या शयनमहलाबाहेर बसलेला गोरंभ त्याला ऐकू जाईल अशा स्वरात मुद्दाम म्हणाला, 'आमचे महाराज एवढ्या मोठ्या राजवाड्यात राहतात, पण काकड्या मात्र शौचकूपात शौचाला बसल्याबसल्या खातात !'

गोरंभाच्या तोंडचे ते शब्द ऐकून राजा पलंगावरून ताडकन् उठला व त्याला विचारू लागला, "काय रे मूर्खा ! मी शौचकूपात जाऊन काकड्या खात बसतो काय ? तू मला तसे खाताना कधी रे पाहिलेस ?'' छे, छे ! असं कसं होईल ? कोण हरामखोर असं बोलला ? गोरंभाने प्रश्न केला. राजा म्हणाला, अरे, तूच तर आत्ता तसं बोललास. तू माझा जुना नोकर आहेस, म्हणून तुला क्षमा केली. तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता, तर त्याला मी यमलोकीच रवाना केले असते.'

मुद्दाम गयावया करीत गोरंभ म्हणाला, 'महाराज, काल रात्री पण मी बराच उशीरापर्यंत द्यूत खेळलो आणि थोडीशी झोप घेऊन, पहाट होताच इकडे आलो. म्हणून मला इथे बसलो असता थोडीशी डुलकी लागली आणि जी गोष्ट कधी घडलीच नही, ती माझ्या तोंडावाटे बाहेर पडली.' गोरंभाने केलेला हा खुलासा ऐकून राजा मनात म्हणाला, 'आपल्या राणीबद्दल व दंतिलाबद्दलही हा मूर्ख असेच बिनबुडाचे बरळला असावा.' अशी समजूत पटताच राजाने दंतिलाला बोलवायला सेवक पाठविला आणि तो आल्यावर आदल्या दिवशी केलेल्या त्याच्या अपमानाबद्दल खेद व्यक्त केला.

ही गोष्ट सांगून दमनक संजीवकाला म्हणाला, 'मित्रा, तेव्हा पिंगलकमहाराजांशी मैत्री जुळून येताच, गर्वाने फुगून जाऊ नकोस, थोरामोठ्यांशी जसा वागशील, तसाच तू माझ्यापाशीही सौजन्याने वाग, म्हणजे तुझे पुढले आयुष्य सुखात जाईल.' संजीवकाने तसे वचन देताच, दमनक त्याला घेऊन पिंगलकाकडे गेला.

वनराज पिंगलकाशी दृष्टादृष्ट होताच, संजीवकाने त्याला नम्रतापूर्वक वंदन केले, तर पिंगलकाने त्याला अभय देऊन त्याचे क्षेम विचारले. मग त्यांच्या भेटीचे रूपांतर दाट मैत्रीत झाले. संजीवकाचं एकदम सात्त्विक वागणं, त्याचा गवतपाल्यासारखा अहिंसक आहार वगैरेचा पिंगलकावर फार प्रभाव पडला. आपल्या वनराज्याचा सर्व कारभार दमनक व त्याचा मोठा भाऊ करटक यांच्यावर सोपवून, पिंगलक हा दिवसातला एवढा वेळ त्या बुद्धिवान व बहुश्रुत अशा संजीवकाशी निरनिराळ्या विषयांवर चर्चा करण्यात घालवू लागला की, त्यामुळे प्रत्यक्ष दमनक व करटक यांनाही पिंगलकाची भेट मिळणे कठीण होऊ लागले.
संजीवकाच्या विचारांच्या प्रभावामुळे पिंगलकाने वन्य पशूंची शिकार करणे व खाणे सोडून दिले. त्यामुळे त्याच्या मांसाहारी मंत्र्यांना आणि सेवकांना उपवास घडू लागले व ते एकामागून एक याप्रमाणे त्याला सोडून जाऊ लागले. म्हटलंच आहे ना ?

फलहीनं नृपं भृत्याः कुलीनमपि चोन्नतम् ।
सन्त्यज्यन्यत्र गच्छन्ति शुष्कं वृक्षामिवाण्डजाः ॥
(वठलेल्या वृक्षाचा त्याग करून, ज्याप्रमाणे पक्षी इतरत्र निघून जातात, त्याचप्रमाणे सेवेचा मोबदला न देणारा राजा कितीही जरी कुलीन व उच्च दर्जाचा असला तरी त्याचे सेवक त्याला सोडून जातात.) याउलट

कालातिक्रमणं वृत्तेर्यो न कुर्वीत भूपतिः ।
कदाचित्तं न मुञ्चन्ति भर्त्सिता अपि सेवकाः ॥
(जो राजा वेतन देण्यात कधी उशीर करीत नाही, त्याने आपल्या सेवकांचा जरी अपमान केला, तरी ते त्याला कधीही सोडून जात नाहीत.)

हे सगळे जगच मुळी पोटावर चालले आहे. ते पोट भरण्यासाठी ब-याप्रमाणे वाईट मार्गांचाही अवलंब केला जातो. समुद्रातले मोठे मासे लहान माशांना खातात, वैद्य रोग्यांना लुबाडतात, व्यापारी गि-हाइकांची लूट करतात, राजे प्रजेची पिळवणूक करतात, चोर निष्काळजी लोकांच्या घरी चो-या करून स्वतःचे पोट भरतात, तर भिक्षुक भोळ्याभाळ्या लोकांना नाना व्रतवैकल्यांत गुंतवून आपली तुंबडी भरतात. अर्थात सर्वत्र केवळ स्वार्थच बोकाळला आहे असे मात्र नाही, आणि स्वार्थी लोकांचे सर्वत्र मनोरथ फलद्रूप होतात असेही नाही. म्हटलंच आहे ना?
सर्पाणां च खलानां च परद्रव्यापहारिणाम् ।
अभिप्राया न सिद्धयन्ति तेनेदं वर्तते जगत् ॥
(सर्पांचे, दुष्टांचे व दुस-यांचे द्रव्य लुबाडणा-यांचे सर्वच बेत सिद्धीस जात नाहीत, म्हणून तर हे जग बरेचसे सुरळीत चालले आहे.)

एके दिवशी भुकेने व्याकुळ झालेले दमनक करटकाला म्हणाला, 'दादा, पिंगलकमहाराज हे आताशा संजीवकाच्या एवढे भजनी लागले आहेत की, आपल्या मंत्रिपदांना अर्थ उरला नाही. त्यांचे आश्रितही त्यांना एकामागून एक असे सोडून चालले आहेत.'
करटक म्हणाला, 'दमनका, उन्मत्त राजे व मदोन्मत्त हत्ती हे स्वतःहून जरी चुकीच्या मार्गाने जाऊ लागले, तरी त्यांच्या तशा वागण्याच्या दोषाचे खापर अनुक्रमे मंत्री व माहूत यांच्याच माथी फुटत असते. म्हणून मी तुला अगोदरच परोपरीने सांगितले होते की, तू संजीवक व पिंगलकमहाराज यांची मैत्री घडवून आणू नकोस. पण तू माझे ऐकले नाहीस. तेव्हा आता त्यांच्याविरुद्ध धुसफुसण्यात काय अर्थ?' दमनक म्हणाला, 'दादा, मी काही नुसता धुसफुसत राहिलो नाही. जशी मी त्यांची मैत्री जुळवून आणली, तशी मी त्यांच्या मैत्रीत फूटही पाडू शकतो.'

करटक म्हणाला, 'दमनका, अरे, असले भलतेच धाडस तू करू नकोस. तू त्यांच्या मैत्रीत फूट पाडू पाहात आहेस, हे नुसते त्या पिंगलकमहाराजांना जरी कळले, तरी आपल्या दोघांची गत काय होईल याची तुला कल्पना आहे ना?' दमनकाने उत्तर दिले, 'माझे हे कारस्थान मी फुटू कसे देईन? अरे, मी हे धाडस करीत आहे हे मलाही मान्य आहे, पण असे धाडस केले म्हणूनच एका तरुण विणकराला सुस्वरूप राजकन्या मिळवता आली ना?'
'ती कशी काय ?'
असा प्रश्न करटकाने केला असता दमनक म्हणाला, 'ऐक . . . 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मित्रभेद भाग - ५
'असाध्य ते साध्य होते, पण त्यासाठी धाडस करावे लागते.'
एका नगरीत एक विणकर तरुण व सुतार तरुण यांची दाट मैत्री होती. एकदा ते दोघे गावातल्या देवळातील वार्षिक उत्सवाला गेले असता, त्या ठिकाणी आलेल्या कमालीच्या सुंदर राजकन्येला पाहून तो विणकर तिच्यावर एकदम मोहित झाला; पण तिच्याशी आपले लग्न होणे अशक्य असल्याचे लक्षात येऊन, तो अतिशय अस्वस्थही झाला.

त्याची ती काहीशी भ्रमिष्टासारखी मनःस्थिती पाहून त्याच्या सुतार मित्राने त्याला त्याच्या तशा वागण्याचे कारण विचारले. तेव्हा तो विणकर तरुण म्हणाला, 'मित्रा आज देवळात पाहिलेली ती असामान्य सुंदर राजकन्या पाहून, मला तिच्याच संगे लग्न करण्याची इच्छा झाली आहे. पण तिचे माझे लग्न होणे ही अश्क्य गोष्ट असल्याने, मी अग्निकुंडात उडी घेऊन माझ्य़ा जीवनाचा अंत करून घेण्याचे ठरविले आहे.'

सुतार म्हणाला, 'अरे मित्रा, एखादी गोष्ट अशक्य आहे म्हणून ज्याला रडत बसण्याची सवय असते, त्याच्या वाट्याला या जगात केवळ दुःखच येते; याउलट, ज्याच्या अंगी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अशक्य गोष्टही शक्य करून दाखविण्याचे धाडस व जिद्द असते, त्याच्याच गळ्यात 'लक्ष्मी' माळ घालते. तेव्हा तुझा मित्र म्हणून मी तुला 'कळ' असलेला एक लाकडाचा गरुड बनवून देतो. तू भगवान विष्णूंचे रूप घेऊन त्या गरुडावर बैस व त्याची 'कळ' दाबून, हवेतून त्या राजवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खास महालात राहणा-या त्या राजकन्येची अपरात्रीच्या वेळी भेट घेत जा. भगवान विष्णू म्हणून ती तुझे स्वागत करील आणि मोठ्या आनंदाने ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. मात्र लग्न झाल्यावर एखाद्या रांगड्या विणकराप्रमाणे तिच्याशी न वागता, तू तिच्याशी एखाद्या खानदानी राजकुमाराप्रमाणे चांगले वागण्याची काळजी घे.'

विणकराला ही गोष्ट पटली. मग आठ-दहा दिवसांत त्या सुतार मित्राने लाकडापासून तयार करून व रंगवून दिलेले चक्र, शंख, गदा व मुकुट धारण करून व त्यानेच तयार करून दिलेल्या कळीच्या गरुडावर बसून, तो तरुण विणकर एका रात्री त्या गरुडाची 'कळ दाबून, हवेतून त्या राजकन्येच्या महालात गेला.

प्रत्यक्ष भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन प्रेमाची याचना करण्याकरिता आपल्याकडे आले, या विचाराने त्या राजकन्येचे मन आनंदाने मोहरून गेले. तिने त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार घातला. मग बराच वेळ प्रेमाच्या गोष्टी झाल्यावर 'भगवान्' पुन्हा गरुडावर बसून तिथून निघून गेले. त्यानंतर त्यांची अशी भेट दररोज रात्री होऊ लागली.

एके रात्री कंचुकी - राजवाड्यातील स्त्रियांवर देखरेख करणारा अधिकारी - त्या राजकन्येच्या बंद महालावरून चालला असता, ती राजकन्या व एक पुरुष यांचे बोलणे त्याच्या कानी पडले. त्याने ते वृत्त दुस-या दिवशी सकाळी राजाच्या कानी घातले. ते ऐकून, मनी धास्तावलेला राजा म्हणाला, 'राजवाड्याभोवती एवढा कडक पहारा असताना आपल्या कन्येला भेटायला येण्याचे धाडस कोण करतो ? खरोखरच मुलीचा पिता होणं ही एक दुःखाचीच गोष्ट म्हटली पाहिजे. म्हटलंच आहे ना ?-
पुत्रीति जाता महतीह चिन्ता ।
कस्मै प्रदेयेति महान्वितर्कः ।
दत्त्वा सुखं प्राप्स्यति वा न वेति ।
कन्यापितृत्वं खलु नाम कष्टम् ।
(मुलगी जन्मणे म्हणजे मोठीच चिंतेची गोष्ट आहे. ती कुणाला द्यावी हा जसा मोठा प्रश्न तसाच तिला दिल्यावर तिला सुख मिळेल की नाही, हाही प्रश्नच असतो. खरोखरीच मुलीचा पिता होणं ही कष्टाची गोष्ट आहे. )

राजाराणीने आपल्या कन्येला फैलावर घ्यायला सुरुवात केली असता, ती त्यांना म्हणाली, 'आई-बाबा ! प्रत्यक्ष भगवान् विष्णू गरुडावर बसून माझ्याकडे येतात व त्यांची पत्नी होण्याचा मला आग्रह करतात. मग मी त्यांना नकार कसा देऊ ? वाटल्यास आज रात्री तुम्ही लपून त्यांना पहा, 'राजाराणीने त्याप्रमाणे त्या रात्री पाहिले व भगवंताचे दर्शन होताच त्यांना आपले हात आकाशाला लागल्यासारखे वाटले. विष्णू निघून जात असताना, त्यांना चोरून नमस्कार करून, त्या दोघांनी आपल्या मुलीचे अपार कौतुक केले.

प्रत्यक्ष भगवान विष्णू आपले आता जावई होणार म्हणजे या जगात आपले कोण वाईट करू शकणार !' असा समज होऊन, त्या राजाने आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून, दुस-या राज्यांवर आक्रमण केले. ते पाहून इतर राजे एकत्र आले व त्यांनी त्या राजाचा दारुण पराभव करून, त्याचे जवळजवळ सर्व राज्य जिंकले.

त्यामुळे तो राजा व त्याची राणी घाबरली आणि मुलीला म्हणाली, 'बेटी, प्रत्यक्ष विष्णू तुझा पती होणार असताना, आपल्याला असा दारुण पराभव का पत्करावा लागला ? उद्या हा राजवाडाही जर शत्रूच्या हाती गेला, तर आपण जायचे कुठे ? तेव्हा आज रात्री भगवान् तुझ्याकडे आले की, त्यांना आपले राज्य परत मिळवून देण्याची विनंती कर.' त्या रात्री तो विष्णुवेषधारी विणकर त्या राजकन्येला भेटायला आला असता, तिने विनंती केली, 'भगवान्, आपण सर्वशक्तिमान् आहात. तेव्हा उद्या आपण माझ्या बाबांच्या सर्व शत्रूंचा धुव्वा उडवून, माझ्या बाबांना त्यांचे राज्य परत मिळवून द्या.'

तिची ती प्रार्थना ऐकून विणकर क्षणभर पेचात पडला. पण दुस-याच क्षणी तो मनात म्हणाला, 'मी जरी सामान्य माणूस असलो, तरी मी या राजकन्येच्या पित्याचा एक प्रजाजन आहे आणि तो माझा स्वामी आहे. तेव्हा प्रसंगी स्वतःचे प्राणही पणाला लावून स्वामीचं व त्याच्या राज्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून उद्या सकाळी आपण राजाच्या सैन्याबरोबर - पण गरुडावर बसून - हवेत संचार करू. म्हणजे आपल्याला खरेखुरे भगवान् विष्णू समजून, शत्रू निश्चितच पळून जाईल.' मनात असे ठरवून तो विणकर तरुण राजकन्येला मुद्दामच म्हणाला, 'प्रिये, तुझ्या वडिलांच्या शत्रूंना जर माझ्या हातून मृत्यु आला तर त्यांना मरणोत्तर स्वर्ग मिळेल. तसे न होता त्यांना नरकाची प्राप्ती व्हावी, म्हणून तू तुझ्या बाबांनाच त्यांच्या सैन्याच्या सहाय्याने शत्रूवर तुटून पडायला सांग. मी त्यांना आशीर्वाद देईन व गरज पडलीच तर सहाय्य करीन.' राजकन्येने ते मान्य केले व त्याप्रमाणे वडिलांना सांगितले. वैकुंठात राहणा-या ख-या भगवान् विष्णूंना हा प्रकार अंतर्ज्ञानाने कळला.

त्यांनी विचार केला, 'माझे रूप धारण केलेला हा विणकर जर उद्या रणभूमीवर पराभूत झाला, 'तर लोकांना तो माझाच पराभव झाल्यासारखा वाटेल व माझ्यावरची त्यांची भक्ती लोप पावेल, तेव्हा याला व याचा सासरा होणार असलेल्या राजाला विजयी करायला हवेच हवे.' मनात असे ठरवून भगवान विष्णूंनी स्वतः त्या विणकराच्या शरीरात प्रवेश केला, स्वतःच्या ख-या गरुडाला त्यांनी त्या विणकराच्या लाकडी गरुडात प्रवेश करण्याची आज्ञा केली, तर त्यांच्या चक्राने व गदेने आपल्या सामर्थ्यासह त्या विणकराच्या अनुक्रमे लाकडी चक्रात व गदेत प्रवेश केला.

आपल्या गरुडावर विष्णूंच्या रूपात बसलेला तो विणकर दुस-या दिवशी सकाळी मोठ्या धैर्याने रणभूमीवर गेला आणि त्याचे असामान्य तेज पाहून राजाच्या शत्रूंनी रणांगणातून पळ काढला. हे कर्तृत्व केवळ आपले व आपल्या सुतारमित्राचे नसून, या कामी आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचे सहाय्य झाले आहे, याची जाणीव त्या विणकराला झाली. त्याने मनोभावे परमेश्वराला नमस्कार केला व तो गरुडासह जमिनीवर उतरला. गावक-यांनी तो विणकर असल्याचे ओळखले, पण तरीही त्याने दाखविलेल्या धाडसाबद्दल ते त्याचा जयजयकार करू लागले. तेवढ्यात राजा तिथे आला व त्याला खरा प्रकार समजला. पण तो म्हणाला, 'राजघराण्यातील एखाद्या सामान्य तरुणापेक्षाही हा धाडसी विणकर तरुण अधिक श्रेष्ठ असल्याने, माझ्या दृष्टीने तो माझा जावई व्हायला योग्य आहे.' मग राजाने त्या विणकर तरुणाशी आपल्या कन्येचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले व त्याला एक स्वतंत्र राज्यही दिले.'

ही गोष्ट करटकाला सांगून दमनक म्हणाला, 'दादा, गुप्त योजनेच्या व धाडसाच्या बळावर त्या विणकराने जशी राजकन्या मिळविली तसेच संजीवक व पिंगलकमहाराज यांच्या मैत्रीत फूट पाडण्यात मी यश मिळवीन.' 'पण बुद्धिमान संजीवक व शक्तिमान पिंगलक यांच्यापुढे तुझ्यासारख्या दुर्बळाचे काय चालणार?' असा प्रश्न करटकाने केला असता दमनक म्हणाला, 'दादा, या जगात जे काम करायला शक्ति असमर्थ ठरते, तेच काम युक्ती सहज करू शकते.


गोष्ट - सहावी
'युक्ती अशी प्रभावी, की तिच्यापुढे शक्ती मस्तक वाकवी.'
एका वनातील वटवृक्षावर कावळ्याचे एक जोडपे घरटे बांधून राहात होते. त्याच वृक्षाच्या ढोलीत राहणारा एक भलामोठा व काळाकुट्ट सर्प त्या जोडप्यातील मादीने घरट्यात घातलेली अंडी - ते जोडपे भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर गेले असता - खाऊन फस्त करी. एकदा त्या महासर्पाने त्यांच्या घरट्यात शिरून, अशीच त्यांची अंडी स्वाहा केली असता, दुःखी झालेले ते जोडपे आपला हितचिंतक असलेल्या एका चतुर कोल्ह्याकडे गेले व घडलेला प्रकार त्याला सांगून म्हणाले, 'कोल्हेदादा, त्या वडाच्या झाडावर आम्ही घरटे बांधण्यात चूक केली हे सुरुवातीलाच कबूल करतो-'
'तुम्ही कसली चूक केली ?' असे त्या कोल्ह्याने मोठ्या उत्कंठेने विचारले असता कावळा म्हणाला, 'म्हटलंच आहे ना ? -
यस्य क्षेत्रं नदीतीरे भार्या च परसङ्गता ।
ससर्पे च गृहे वासः कथं स्यात् तस्य निर्वृतिः ।
(ज्याचे शेत नदीतीरी असते, ज्याची बायको दुसर्‍याच्या नादी लागलेली असते व ज्याचे वास्तव्य सर्प राहात असलेल्या घरात असते, त्याला निश्चिंतपणा कसा लाभावा?)
'तेव्हा कोल्हेदादा, ज्याच्या ढोलीत सर्पाचे वास्तव्य आहे अशा त्या वडावर घरटे बांधण्यात आमची चूक झाली खरी, पण आता दुसर्‍या दूरच्या झाडावर नव्याने घरटं बांधायचं आणि तिथेही दुसरा एखादा साप आला की, पुन्हा तिसरीकडे बिर्‍हाड हलवायचं, ही काय साधी गोष्ट आहे? तेव्हा एकतर या कायमच्या बोकांडी बसलेल्या संकटातून सुटण्याचा आम्हाला उपाय सांग, किंवा आमच्यासारख्या दुर्बळांचा जन्म असली संकटे निमूटपणे भोगण्यासाठीच असतो, असे तरी स्पष्टपणे सांग.'
कोल्हा म्हणाला, 'कावळेमामा व कावळूमामी, तुम्ही बिलकूल निराश होऊ नका. या जगात जो युक्ती योजतो, तो शरीराने जरी दुर्बळ असला तरी प्रबळ ठरतो, तर युक्ती योजू न शकणारा जरी शारीरिक सामर्थ्याच्या दृष्टीने कितीही प्रबळ असला, तरीही तो दुर्बळ ठरतो. म्हटलंच आहे ना ?
उपायेन जयो यादृग् रिपोतादृग न हेतिभिः ।
उपायज्ञोऽल्पकायोऽपि न शूरैः परिभूयते ॥
(युक्तीने जसा शत्रूवर विजय मिळविता येतो, तसा तो शस्त्रांनीही मिळवता येत नाही. युक्तिबाज हा सामर्थ्याच्या दृष्टीने जरी किरकोळ असला, तरी तो पराक्रमी लोकांकडूनही पराभूत होत नाही.)
'कावळेमामा व कावळूमामी, लहानसानच नव्हे, तर मध्यम व मोठ्या आकाराच्या माशांनाही कपटाने खाणार्‍या एका बगळ्याचा, एका किरकोळ खेकड्याने कसा जीव घेतला ते तुम्हाला ठाऊक आहे ना?'
'ती गोष्ट मला ठाऊक नाही,' असे कावळा म्हणताच कोल्हा म्हणाला, 'कावळूमामी, तुम्ही पण ऐका-

गोष्ट सातवी
'पापे पचली,' असे दिसते, पण त्यांचे फळ भोगावेच लागते.
एका वनातील सरोवराकाठच्या वृक्षावर एक बगळा राहात असे. तो त्या सरोवरातले मासे, बेडूक आदि पकडून, त्यावर आपली उपजीविका करी. पुढे वाढत्या वयाबरोबर, मासे पकडण्याकरिता आवश्यक अशी चपळता अंगी न उरल्याने, त्याची उपासमार होऊ लागली. त्यामुळे एके दिवशी तो मुद्दाम त्या सरोवराकाठी अश्रू ढाळीत बसला.
त्याला रडताना पाहून एका खेकड्याने पुरेशा अंतरावरून त्याच्या दुःखाचे कारण विचारले असता, तो कपटी बगळा खोटेच म्हणाला, 'काय सांगू खेकडोजी, एक तर आजवर या सरोवरातल्या निरपराध माशांना मारून खाल्ल्याबद्दल मला दुःख झालं आहे आणि दुसरं म्हणजे लवकरच बारा वर्षे टिकणार्‍या एका भयंकर दुष्काळाला सुरुवात होणार असून, त्यात या सरोवरातले सर्व प्राणी आटून जाऊन, तुम्हा सर्वांवर तडफडून मरण्याचा प्रसंग येणार आहे, असे भविष्य काल एका ज्योतिषाने मला सांगितल्यापासून तर, माझ्या मूळच्या दुःखात भर पडली आहे. त्यामुळे मला एकूण जीवनाचा वीट आला असून, मी आमरण उपोषण करून याच ठिकाणी माझा देहांत करून घ्यायचा ठरविले आहे.'
त्या बगळ्याच्या तोंडून ही भविष्यवाणी ऐकताच त्या खेकड्याने ती गोष्ट त्या सरोवरातल्या जलचरांच्या कानी घातली. त्याबरोबर ते सर्व काठावर आले व त्या बगळ्याला विनवू लागले, 'बगळूमामा, असा स्वतःचा घात करून कशाला घेता ? त्यापेक्षा तुम्ही आम्हाला वाचविण्याचा एखादा उपाय शोधून काढा आणि आम्हाला वाचवून तुम्हीही जिवंत रहा.'
बगळा म्हणाला, 'एक उपाय आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला फार त्रास घ्यावा लागणार आहे. इथून काही अंतरावर जे एक अत्यंत खोल व विस्तीर्ण असे सरोवर आहे, त्यातले पाणी कुठल्याही दुष्काळात पूर्णपणे आटून जाणे शक्य नसल्याने, त्या सरोवरात तुमच्यापैकी एकेकाला नेऊन सोडायचे. त्यामुळे मला जरी त्रास घ्यावा लागणार असला, तरी तुमचे प्राण वाचतील आणि त्यायोगे माझी सर्व पापे धुवून जातील.'
'मग बगळूमामा, आतापासूनच या कामाला सुरुवात करा. देव तुमचं भलं करील.' असं त्या सरोवरातले मासे वगैरे म्हणताच, त्या कपटी बगळ्याने एकेका माशाला चोचीने उचलून दूर न्यावे व तिथे असलेल्या एका खडकावर त्याला आपटून मारून खावे, असे संहारसत्र सुरू केले. त्या सरोवरातल्या माशांना 'दूरच्या सरोवरात नेऊन सोडलेले तुमचे भाईबंद मोठ्या मजेत आहेत.' असे तो बगळा अधुनमधून सांगू लागल्याने, त्याचे हे कपटनाट्य सुरळीतपणे चालू राहिले.
पण एके दिवशी त्या खेकड्याला त्या बगळ्याबद्दल संशय आला. तो मनात म्हणाला, 'चोचीत मासे नेऊन नेऊन हा बगळा थकून जाण्याऐवजी, याची प्रक्रुती सुधारत आहे, हे कसे काय?' तो त्या बगळ्याला म्हणाला, 'बगळूमामा, वास्तविक त्या दिवशी मीच प्रथम तुमची प्रेमाने चौकशी केली. असे असता तुम्ही मला मात्र अजूनही त्या सुरक्षित सरोवरात का नेत नाही?'
बगळ्याला खेकड्याचे मांस खाण्याचा मोह अनावर झाला व तो त्याला पाठीवर घेऊन जाऊ लागला. पण तो खडक जवळ येताच जेव्हा त्या खेकड्याला माशांच्या काट्यांची व हाडांची मोठी रास दिसली, तेव्हा मनीचा संशय बळावून त्याने चौकशी केली, 'बगळेदादा, त्या खडकापाशी माशांच्या काट्यांची व हाडांची रास कशी काय हो जमा झाली?'
'पाण्यातला हा प्राणी आपल्याला हवेत काय इजा करणार?' अशा घमेंडीत तो बगळा त्या खेकड्याला म्हणाला, 'अरे मूर्खा ! कुठला आलाय दुष्काळ आणि कुठले आलेय ते न आटणारे सरोवर ? तुम्हा मूर्ख जलचरांना मी केवळ त्या थापा मारल्या. तुमच्या त्या तळ्यातून आजवर ज्या ज्या माशाला मी इकडे आणले, त्याला त्याला मी त्या खडकावर आपटून खाऊन टाकले. त्यांच्याच हाडाकाट्यांची ही रास आहे. तुझीही अखेरची घटका जवळ आली आहे. वाटल्यास मरणापूर्वी तू आपल्या कुलदेवतेचं स्मरण कर.'
बगळ्याचे कपट असे उघड होताच, त्या खेकड्याने आपल्या नांग्यांच्या कैचीने पटकन् त्याची मान मुरगळून त्याचे मस्तक धडावेगळे केले व केवळ आपल्यावरचेच नव्हे, तर त्या सरोवरात उरलेल्या सर्व जलचर प्राण्यांच्या प्राणांवरचेही संकट दूर केले.'
ही गोष्ट त्या कावळा-कावळीला सांगून तो कोल्हा त्यांना म्हणाला, 'हे पहा, इथून पूर्व दिशेला सरोवर आहे ना... त्यात जलक्रीडा करण्याकरिता राजा, प्रधान किंवा त्यांच्या घरच्या स्त्रिया दररोज येतात व जलविहार करण्यासाठी सरोवरात शिरण्यापूर्वी आपापल्या गळ्यांतले रत्‍नामोत्यांचे कंठे वा सुवर्णमाला काठावर ठेवून देतात. तुम्ही उद्या त्या सरोवराकाठी जा आणि काठावर ठेवून दिलेल्या अशा माळांपैकी एखादी माळ चोचीने उचलून व हळूहळू उडून, ती माळ तुम्ही त्या दुष्ट सर्पाच्या ढोलीत टाका म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट होऊन जाईल.'
दुसर्‍या दिवशी सकाळी तो कावळा व कावळी त्या सरोवराकडे गेली असता, त्यांना प्रत्यक्ष राणी व राजघराण्यातल्या इतर काही स्त्रिया गळ्यांतले रत्‍नहार व सोनसाखळ्या काठावर ठेवून सरोवरात जलविहार करीत असलेल्या दिसल्या. कावळीने झडप घालून त्यातली एक सोनसाखळी चोचीने उचलली व ती त्या कावळ्यासह त्या वडाच्या दिशेने मुद्दाम हळूहळू उडू लागली. त्याबरोबर त्या स्त्रियांसंगे आलेली सेवकमंडळी त्या दोघांच्या पाठोपाठ धावू लागली. शेवटी त्या कावळीने ती सोनसाखळी त्या वटवृक्षाच्या ढोलीत टाकली व पतीसह एका जवळच्या झाडावर जाऊन बसली. तेवढ्यात राणीच्या सेवकांनी त्या ढोलीत डोकावून पाहिले असता, त्यांच्या दृष्टीने तो काळा सर्प पडला. त्यांनी त्याला काठ्या व दगड यांचा वापर करून ठार केला. तो मारला गेल्यामुळे ते कावळ्याचे जोडपे सुखी झाले.'
ही गोष्ट सांगून दमनक करटकाला म्हणाला, 'दादा-
बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलम् । (ज्याला बुद्धी असते त्याचाच प्रभाव पडतो, ज्याला बुद्धी नाही त्याच्यात कुठून 'दम असणार ?)
'असं जे म्हटलं जातं ते खरं आहे.'
'अरे दमनका, समजा, तुला पुरेपूर बुद्धी असली तरी तिच्या जोरावर तू पिंगलक महाराज व संजीवक या जीवश्चकंठश्च मित्रांमध्ये फूट कशी काय पाडू शकणार?'
करटकाने हा प्रश्न केला असता दमनक आत्मविश्वासाने म्हणाला, 'दादा, अरे एक दुर्बळ ससा जर बुद्धीच्या सामर्थ्यावर एका सिंहाचा जीव घेऊ शकतो, तर तशाच बुद्धीच्या सामर्थ्यावर पिंगलकमहाराज व संजीवक यांच्यात मला फूट पाडता का येऊ नये?'
'ती गोष्ट काय आहे?' असे करटकाने विचारताच दमनक म्हणाला, 'ती गोष्ट अशी आहे-

गोष्ट आठवी
'बुद्धिवंताची शक्ती खरी, तो जाई तिथे विजयाची गुढी उभारी'
एका वनात भासुरक नावाचा सिंह राहात असे. तो कारण नसता दररोज त्या वनातल्या अनेक पशूंची शिकार करी व त्यांतल्या एखाद्यालाच खाऊन, बाकीचे तसेच टाकून देई. त्यामुळे त्या वनातल्या पशूंची संख्या रोडावू लागली. अखेर एके दिवशी त्या वनातले हत्ती, रानरेडे, डुक्कर, ससे वगैरे प्राण्यांचे एक शिष्टमंडळ त्या सिंहाकडे गेले व त्याला वंदन करून म्हणाला, 'महाराज, आपली दररोजची भूक भागविण्यासाठी आपल्याला एखादा पशू पुरा पडत असताना, आपण पशूंची अमर्याद हत्या करता. हे असेच चालू राहिले, तर लवकरच हे वन पशूरहित होईल व आपल्यावरही उपासमारीचा प्रसंग येईल. तेव्हा यापुढे आम्हीच आपापसांत ठरवून दररोज आपल्याकडे ठरलेल्या वेळी एक वा दोन पशू पाठवीत जाऊ. त्यामुळे श्रम न पडता आपली भूक भागेल आणि आम्हा पशूंची विनाकारण होणारी हत्याही थांबेल.'
तो सिंह या गोष्टीचा विचार करू लागल्याचे पाहून हत्ती म्हणाला, 'महाराज, राजनीती या ग्रंथात असं सांगितलं आहे -
गोपालेन प्रजाधेनोर्वित्तदुग्धं शनैः शनैः ।
पालनात्पोषणाद् ग्राह्यं न्याय्यां वृत्तिं समाचरेत् ॥
(प्रजा ही गाईसारखी आहे, तर राजा हा गवळ्यासारखा आहे. तेव्हा या गवळ्याने प्रजारूपी गाईचे पालनपोषण करून, तिला त्रास न होईल अशा तर्‍हेने, तिच्यापासून धीरे धीरे धनरूपी दूध मिळवावे, व न्याय्य वृत्तीने आपले जीवन जगावे.)
मग रानरेडा पुढे होऊन म्हणाला, 'महाराज, राजनीतीत तर असंही सांगितलंय-
अजामिव प्रजां मोहाद्यो हन्यात् पृथिवीपतिः ।
तस्यैका जायते तृप्तिर्न द्वितीया कथचंन ।
(बोकडाला कापणार्‍या एखाद्या कसायाप्रमाणे जो राजा धनलोभापायी आपल्या प्रजेला पुरेपूर मारतो - म्हणजे लुटतो - त्याचे फारतर एकदा समाधान होऊन शकते पण दुसर्‍या वेळेला ती समाधानाची संधी त्याला कधीही लाभत नाही.)
रानरेड्याचे बोलणे पूर्ण होते न होते, तोच एक चतुर ससा पुढे सरसावून म्हणाला, 'महाराज, आपल्याला माझ्यासारख्यानं काय सांगावं ? तरीही 'राजनीती' या ग्रंथातल्या एका मौल्यवान वचनाची मी आपल्याला आठवण करून देतो-
यथा बीजांकुरः सूक्ष्मः प्रयत्‍नेनाभिरक्षितः ।
फलप्रदो भवेत् काले तद्वल्लोकः सुरक्षितः ।
जसे सूक्ष्म अशा बीजांकुराचे प्रयत्‍नपूर्वक रक्षण केले असता कालांतराने ते वृक्षरूप होऊन फळे देऊ लागते. तसेच प्रजेला सुरक्षित ठेवले असता (राजाला) तिच्यापासून वैभव प्राप्त होते.)
शिष्टमंडळाचे हे म्हणणे पटल्यामुळे भासुरकाने ते मान्य केले व ठरल्याप्रमाणे ते पशू दर दिवशी त्यांच्यापैकी एकेकाला त्या वनराजाकडे अगदी ठरविल्यावेळी पाठवू लागले. असे होता होता एके दिवशी. त्या शिष्टमंडळाबरोबर गेलेल्या बुद्धिमान् सशाचीच त्या भासुरकाकडे भक्ष्य म्हणून जाण्याची पाळी आली.
अश्रुभरल्या डोळ्यांनी आपल्या बायकापोरांचा निरोप घेऊन त्या सशाने सिंहाच्या गुहेचा रस्ता धरला. पण चालता चालता त्याच्या मनात विचार आला, 'या वनराज भासुरकाचा या वनातल्या पशूंना काहीतरी उपयोग आहे का ? मुळीच नाही. उलट याने बेछूटपणे प्रजाजनांना मारू नये म्हणून त्याच्याच गुहेत दररोज एका प्राण्याने आपणहून जायचे, व त्याच्या भक्ष्यस्थानी पडायचे, हा काय न्याय झाला ? त्यापेक्षा यालाच कायमचे नाहीसे केले तर ?' तो मनात असे म्हणतो न म्हणतो तोच, त्याला सभोवती दगडी बेंड बांधलेली एक विहीर दिसली. त्या विहिरीकडे जाऊन त्याने आत डोकावून पाहिले असता, त्याला आतल्या पाण्यात स्वतःचे स्पष्ट प्रतिबिंब दिसले आणि त्याचक्षणी त्याच्या तरल बुद्धीने त्या बेफाम सिंहाला कसे मारायचे याबाबत त्याला मार्गदर्शन केले.
मग उगाच इकडे तिकडे भटकण्यात वेळ घालवून तो ससा बर्‍याच उशिरा त्या सिंहाकडे गेला व संतप्त स्थितीत गुहेबाहेर येरेझारा घालणार्‍या सिंहाला नमस्कार करून म्हणाला, 'महाराज, आपण माझ्यावर रागावलात ते योग्य असले, तरी मला यायला उशीर झाला, यात माझा अपराध नाही. आपली भूक पुरेपूर भागावी, म्हणून मी माझ्या आणखी चार नातेवाईकांसह आपल्याकडे येण्यासाठी घरून वेळीच निघालो होतो, पण वाटेत दुसर्‍याच एका सिंहाने आम्हाला आडवून विचारले, 'काय हो, एवढ्या घाईने तुम्ही कुठे निघालात ?'
'महाराज, आम्ही त्याला खरे ते सांगताच तो सिंह मला म्हणाला, 'या वनाचा राजा मी असताना, तुम्ही त्या उपटसुंभ भासुरक्याला का म्हणून वनाचा राजा मानता?' तू एकटाच त्याच्याकडे जाऊन सांग की, तुझ्यात ताकद असली, तर तू माझ्याशी लढायला ये.' याप्रमाणे बोलून, त्या सिंहाने माझ्या चार नातेवाईकांना त्याच्याकडे ओलीस म्हणून ठेवून घेतले व स्वतःचा निरोप तुम्हाला सांगण्याकरिता फक्त मलाच तेवढे इकडे पाठवून दिले.'
त्या सशाने सांगितलेली ही हकीकत त्या भासुरकाला खरी वाटली व त्याच्या अंगाची लाहीलाही झाली. रागाने लटलट कापू लागलेला तो त्या सशाला म्हणाला, 'काय, तो महामूर्ख मला असं म्हणाला ? तर मग तू मला आत्ताच त्याच्याकडे घेऊन चल. मी त्याला नाही ठार केले तर 'भासुरक' हे नाव लावणार नाही.'
यावर त्याला अधिक डिवचण्यासाठी तो ससा मुद्दामच म्हणाला, 'पण महाराज, त्या सिंहाची गुहा, सभोवताली दगडी तटबंदी असलेल्या एका छोट्याशा वर्तुळाकार किल्ल्यात आहे. तो केव्हाही त्या किल्ल्यातील गुहेचा आश्रय घेऊ शकतो. आणि किल्ल्याचं सामर्थ्य किती असतं, ते काय आपल्याला मी सांगायला हवं ? युद्धशास्त्रावरील एका ग्रंथा म्हटलं अहे -
न गजानां सहस्त्रेण न च लक्षेण वाजिनाम् ।
यत्कृत्यं साध्यते राज्ञां दुर्गेणैकेन सिद्ध्यति ॥
(राजाचे जे काम हजार हत्तींच्या किंवा लाख घोड्यांच्या सहाय्याने होऊ शकत नाही, ते काम एका किल्ल्यामुळे होते.)
भडकलेला भासुरक म्हणाला, 'अरे, तो किल्ल्यातच काय, पण सप्तपाताळात जरी दडून राहिला, तरी मी त्याला शोधून ठार करीन. या बाबतीत शास्त्र असं सांगतं -
जातमात्रं न यः शत्रुं रोगं च प्रशमं नयेत् ।
महाबलोऽप तेनैव वृद्धिंप्राप्य स हन्यते ॥
(शत्रू काय किंवा अग्नी काय, निर्माण होतो न होतो, तोच त्याचा नायनाट करावा. एकदा का तो वाढला, की मोठ्या बलवंताचाही तो प्राण घेतो.)
परंतु तरीही ससा मुद्दाम म्हणाला, 'महाराज, आपलं म्हणणं योग्य असलं तरी मला 'राजनीतिशास्त्र' या ग्रंथातलं एक वचन आपल्या निदर्शनास आणावंस वाटतं. ते वचन असं आहे-
अविदित्वत्मनः शक्तिं परस्य च समुत्सुकः ।
गच्छन्नभिमुखो नाशं याति वह्नौ पतङ्गवत् ॥
(शत्रूच्या व आपल्या सामर्थ्याचा अंदाज न घेता, जो त्याच्यावर घाईने चालून जातो, त्याचा अग्नीवर झेप घेणार्‍या पतंगाप्रमाणे नाश होतो.)
पण लगेच स्वतःला सावरल्यासारखे दाखवून तो ससा भासुरकाला म्हणाला, 'अर्थात्‌ हे वचन आपल्यासारख्याला लागू होत नाही. कारण देवांनाही भारी होण्याएवढं सामर्थ्य आपल्या अंगी असताना, त्या शेळपटाची आपल्यापुढे डाळ कशी काय शिजणार ?' सशाने केलेल्या स्तुतीमुळे हवेत तरंगू लागलेला तो भासुरक मोठ्या ऐटीत त्याच्या पाठोपाठ चालू लागला.
बर्‍याच वेळाने ती विहीर दृष्टीच्या टप्प्यात येताच ससा त्याला म्हणाला, 'महाराज, तोच आपल्या कट्टर शत्रूचा किल्ला. आपले नुसते दुरून दर्शन होताच, बेट्याने त्या किल्ल्यातील गुहेत दडी मारलेली दिसते.'
भासुरकाने त्या विहिरीजवळ जाऊन आत डोकावून पाहिले असता, आतल्या पाण्यात पडलेले आपलेच प्रतिबिंब दिसले. आपल्याला आव्हान देणारा हाच तो आपला शत्रू अशा समजुतीने त्याने गर्जना केली. तिचा प्रतिध्वनी निघताच 'आपला शत्रूही आपल्याकडे पाहून गरजतोय, 'असा समज होऊन, त्याने त्या प्रतिबिंबावर झेप घेतली आणि त्या पाण्यात थोडा वेळ गटांगळ्या खाऊन, भासुरकाला अखेर जलसमाधी मिळाली. अशा रीतीने एका सामान्य शक्तीच्या सशाने आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर भासुरकाला मारले आणि स्वतःचेच नव्हे तर भविष्यकाळात बळी जाणार असलेल्या असंख्य वन्य पशूंचे प्राण वाचविले.
ही गोष्ट करटकाला सांगून दमनक कोल्हा त्याला म्हणाला, 'दादा, मीसुद्धा माझ्या बुद्धीच्या सामर्थ्यावर पिंगलक व संजीवक यांच्या मैत्रीत फूट पाडतो. फक्त तू मला आशीर्वाद दे.' करटकाने 'तू तुझ्या कामात यशस्वी हो,' असे म्हणताच दमनक पिंगलकाकडे गेला व नमस्कार करून चूपचाप उभा राहिला. त्याला तसे उभे राहिलेले पाहून पिंगलकाने विचारले, 'दमनका, आताशा तू माझ्याकडे चुकूनही येत नाहीस, हे कसे ?'
दमनक बोलू लागला, 'महाराज, त्या संजीवकाशी मैत्री जुळवल्यापासून आम्ही इतर सर्व मंत्री जर आपल्या दृष्टीने कुचकामी ठरलो आहोत, तर उगाच आपल्याकडे यायचे तरी कशाला ? मात्र आता आपल्यावर व आपल्या राज्यावर संकट येऊ पाहात असल्याने, मंत्री असलेल्या मला चूप बसून राहता येत नाही, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. म्हटलेच आहे ना?'
प्रियं वा यदि वा द्वेष्यं शुभं वा यदि वाऽशुभम् ।
अपृष्टोऽपि हितं ब्रूयात्‍ यस्य नेच्छेत्पराभवम् ॥
(ज्याचा पराभव होऊ नये असे आपणास वाटते, त्याला बरे वाटो वा तिरस्करणीय वाटो, शुभ वाटो वा अशुभ वाटो, त्याने न विचारताच आपण-त्याच्या हिताचे जे असेल ते सांगून टाकावे.)
दमनक पुढे म्हणाला, 'महाराज, आता मी जे आपल्याला सांगणार आहे ते संजीवकाला मात्र सांगू नका. महाराज, तो आताशा मनातून आपला अतिशय तिरस्कार करतो. तो कालच मला म्हणाला, 'पिंगलकमहाराजांना काडीचीही अक्क्ल नाही. तेव्हा लवकरच मी त्यांना ठार करीन आणि मी स्वतःच या वनाचा राजा होईन.'
पिंगलक म्हणाला, 'दमनका, एकतर माझा संजीवक असं बोलणं शक्य नाही आणि समजा दुसरं म्हणजे, तो चुकून असे बोलला असला, तरी ज्याला अभय देऊन मी आपला मानला, त्याला मी कधीही अंतर देणार नाही. म्हटलंच आहे ना? -
अनेकदोषदुष्टोऽपि कायः कस्य न वल्लभः ।
कुर्वन्नपि व्यलीकानि यः प्रियः प्रिय एव सः ॥
(अनेक दोष किंवा व्याधी यांमुळे त्रासदायक झाले, तरी आपले शरीर कुणाला प्रिय असत नाही ? त्याचप्रमाणे जो प्रिय असतो, त्याने जरी नको त्या गोष्टी केल्या, तरी तो प्रियच राहतो.)
'पण महाराज, जो आपल्या वाईटावर आहे. त्यालाही आपण आपला मानता?' असा प्रश्न दमनकाने केला असता पिंगलक म्हणाला, 'बाबा रे -
उपकारिषु यः साधूः साधुत्वे तस्य को गुणः ।
अपकारिषु यः साधुः स साधुः सद्बिरुच्यते ॥
(जो उपकारकर्त्याशी चांगला वागतो, त्याच्या चांगलेपणाला काय अर्थ आहे ? आपल्यावर उपकार करणार्‍याशीही जो चांगला वागतो, तोच खरा साधुपुरुष, असे सज्जन म्हणतात.)
दमनक म्हणाला, 'महाराज, आपले हे तत्त्वज्ञान एखाद्या साधूच्या तोंडी शोभून दिसणारे असले, तरी राजाच्या तोंडी शोभून दिसणारे नाही. राज्य चालविण्याच्या दृष्टीने पार निकामी असलेल्या त्या गवतखाऊ संजीवकाच्या नादी लागून, आपल्यातलं क्षात्रतेज लोप पावू लागलं आहे, राज्याकडे व सेवकांकडे आपलं दुर्लक्ष होऊ लागलं आहे आणि त्यामुळे सेवक आपल्याला सोडून इतरत निघून जाऊ लागले आहेत. हीच स्थिती जर पुढेही चालू राहिली, तर मला आपले व आपल्या राज्याचे भवितव्य आशादायक दिसत नाही. तेव्हा आपण त्या संजीवकाची संगत सोडा. एका ढेकणाच्या संगतीमुळे मंदविसर्पिणी नावाची ऊ प्राणास मुकली ती गोष्ट आपल्याला ठाऊक आहे ना?
'नाही, ती गोष्ट मला सांग,' असा आग्रह पिंगलकाने धरताच दमनक म्हणाला, 'ऐका-

गोष्ट नववी
'संगत धरता दुष्टाची, शाश्वती नुरे जीविताची.'
एका राजाच्या शयनमहालातील पलंगावरच्या गाद्या-गिरद्यात 'मंदविसर्पिणी' नावाची एक पांढरी ऊ राहात होती. रात्री राजाला गाढ झोप लागली की, ती हळूहळू त्याचे रक्त पिई व सुखात राही.
एकदा तिच्याकडे 'अग्निमुख' नावाचा टपोरा ढेकूण आला. ती त्याला निघून जायला सांगू लागताच, तो म्हणाला, 'बाईसाहेब, घरी आलेल्या अतिथीला मानाने वागवावे, असे आपले धर्मशास्त्र सांगते. मी आजवर नेभळट माणसांचे बेचव रक्त प्यायलो, दुष्टांच्या कडू रक्ताची चव घेतली, भडक लोकांच्या तिखट रक्ताचा आस्वाद घेतला आणि आंबटशौकीन लोकांच्या रक्ताचीही रुची घेतली. पण गोड गोड पक्वान्नांवर ज्याचं शरीर पोसलं गेलं आहे, अशा एखाद्या राजाच्या गोड रक्ताचा मनसोक्त आस्वाद घेण्याची माझी इच्छा अजून अपुरी राहिली आहे. ती पूर्ण व्हावी, म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. तेव्हा आजची रात्र मला इथे आसरा द्या. बाईसाहेब, राव असो, रंक असो, प्रत्येकाला एकदा तरी चांगलं -चुंगल खावं -प्यावंस वाटतंच. म्हटलंच आहे ना?' -
रंकस्य नृपतेर्वापि जिव्हासौख्यं समं स्मृतम्
तन्मात्रं च स्मृतं सारं यदर्थ यतते जनः ॥
(रंक असो वा राजा असो, सर्वांमधे जिभेचे चोचले पुरविण्याची जागरूकता सारखीच असते. या जगात तीच तर महत्त्वाची गोष्ट मानली जाते व तिच्यासाठी लोकांची धडपड चाललेली असते.)
अग्निमुख पुढं म्हणाला, 'बाईसाहेब, मला बिलकूल उताविळी नाही. वाटल्यास तुम्ही प्रथम राजाचे रक्त पोटी-पोटभर पिऊन घ्या आणि मग त्याला माझ्या हवाली करा. मग तर झालं?' अग्निमुखाच्या या बोलण्यावर त्या मंदविसर्पिणीचा विश्वास बसला व तिने त्याला लपून राहण्यासाठी त्या पलंगाचा एक कोपरा दाखविला.
तेवढ्यात राजा आला व पलंगावर पहुडला. त्याला पाहताच, त्याचे गोड रक्त पिण्याच्या हव्यासामुळे त्या अग्निमुखातला उतावळेपणा जागृत झाला आणि मंदविसर्पिणीला आपण काय आश्वासन दिले आहे ते विसरून, त्याने राजाजवळ जाऊन त्याच्या मांडीचा कडकडून चावा घेतला. स्वभाव कुठे बदलतो ? म्हटलंच आहे ना ?-
स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा ।
सुतप्तमपि पानीयं पुनर्गच्छति शीतताम् ॥
(पाणी जरी कितीही तापविले तरी ज्याप्रमाणे ते पुन्हा थंड होते, त्याचप्रमाणे कितीही जरी उपदेश केला, तरी स्वभाव बदलणे अशक्य असते. )
त्या अग्निमुखाने घेतलेल्या चाव्यामुळे एखादी सुई टोचल्यासारखी वेदना होऊन, राजा अंथरुणातून उठला व त्याने महालाच्या दरवाजावर पहारा देणार्‍या सेवकाला तो ढेकूण शोधून मारण्याचा हुकूम दिला.
त्या 'राजद्रोही' ढेकणाला शोधून मारण्यासाठी त्या सेवकाने पलंगावरची अंथरुणे-पांघरुणे उलटीपालटी करायला सुरुवात करताच, त्या चपळ ढेकणाने पलंगाच्या चौकटीतील फटीत दडी मारली आणि त्या सेवकाला एका कोपर्‍यात चूपचाप बसलेली मंदविसर्पिणी दिसली. त्याबरोबर 'हीच ऊ महाराजांच्या मांडीला चावली असावी,' असा समज होऊन, त्या सेवकाने तिला चिरडून टाकले.
ही गोष्ट सांगून दमनक पिंगलकाला म्हणाला, 'महाराज, तापलेल्या लोखंडावर जर पाणी पडले, तर ते वाफारून नाहीसे होते आणि स्वाती नक्षत्रात, जर ते समुद्रातील एखाद्या शिंपल्यात पडले तर ते मोती बनते. वाईट व चांगल्या संगतीचा परिणाम असा भिन्नभिन्न होतो. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की, आपल्या व राज्याच्या दृष्टीने पूर्ण कुचकामी असलेल्या त्या कपटी व गवतखाऊ संजीवकाच्या संगतीत आपण निदान यापुढे तरी राहू नका. आपल्या माहितीतल्या लोकांना दूर सारून, जो परक्यांना जवळ करतो त्याच्यावर - जसा त्या ककुद्रमावर ओढवला तसा - मरण्याचा प्रसंग ओढवतो.'
'तो कसा काय ?' असा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक सांगू लागला-

गोष्ट दहावी
स्वजनांना त्यागून जो परक्याकडे जाई, तो दोन्हीकडून मार खाई
एका वनात राहणारा 'चंडरव' नावाचा कोल्हा भक्ष्याच्या शोधार्थ भटकता भटकता भर रात्री एका नजिकच्या गावात शिरला आणि एका रंगार्‍याच्या घराच्या परसदारी गेला व निळ्या रंगाने भरलेल्या एका मोठ्या भांड्यात पडला. बरीच धडपड केल्यावर निळ्या रंगाने चिंब झालेला तो कोल्हा त्या भांड्यातून बाहेर पडला व कुत्र्यांची नजर चुकवीत पुन्हा रानात गेला.
दुसर्‍या दिवशी उजाडताच जेव्हा तो निळा कोल्हा त्या वनातील वाघ, सिंह, लांडगे आदि प्राण्यांच्या दृष्टीस पडला, तेव्हा भीतीने पळून जाता जाता ते आपापसांत म्हणू लागले, 'कोण बरं असावा हा प्राणी ? आपल्याशी तुलना करता हा जरी आकाराने लहान असला तरी याचं सामर्थ्य जर मोठं असलं, तर हा आपल्याला मारल्याशिवाय कसा राहील? तेव्हा याच्यापासून दूर गेललंच बरं. म्हटलंच आहे ना?-
न यस्य चेष्टितं विद्यात् न कुलं न पराक्रमम् ।
न तस्य विश्वसेत् प्राज्ञो यदीच्छेत् श्रियमात्मनः ॥
(आपण सुरक्षित राहावे असे ज्या सूज्ञाला वाटत असेल, त्याने ज्याची वागण्याची रीत, कूळ किंवा पराक्रम माहीत नाहीत, अशावर कधीही विश्वास ठेवू नये.)
याप्रमाणे बोलून ते वन्य प्राणी पळून जाऊ लागल्याचे पाहून, त्या निळ्या कोल्ह्याने त्यांच्या या गैरसमजुतीचा फायदा उठविण्याचे ठरविले. तो त्यांना हाका मारून म्हणाला, 'बाबांनो, असे पळून न जाता मी काय सांगतो ते ऐका. या वनातील प्राण्यांना योग्य असा राजा नसल्याने, ब्रह्मदेवाने कालच मला निर्माण केले. 'ककुद्रम' असे माझे नाव ठेवले आणि स्वर्गलोकीच मला राज्याभिषेक करून, आज पहाटे मला पृथ्वीवरील या वनाचा राजा म्हणून पाठवून दिले.' त्याच्या या सांगण्यावर सिंहादि मोठमोठ्या बलवान पशूंचाही विश्वास बसला व जो तो त्याच्या सेवेला लागला.
प्रधान या नात्याने सिंहाने दररोज शिकार करून ककुद्रमाला दोन वेळा चांगले मांस खायला आणून द्यावे, शरीररक्षक म्हणून वाघाने त्याचे रक्षण करून भोजनोत्तर त्याला विडे आणून द्यावे, द्वाररक्षक म्हणून लांडग्याने राजाला भेटायला येणार्‍या-जाणार्‍यांवर नियंत्रण ठेवावे, असा दिनक्रम सुरू झाला.
पण वाघ, सिंह, लांडगे अशांसारखे शक्तिशाली प्राणी सेवेला लागताच ककुद्रम शेफारून गेला व आपल्या जातभाईंना तुच्छ मानू लागला. वास्तविक त्यांनी त्याला ओळखले होते. पण 'आपलाच एक जातभाई वनाचा राजा म्हणून मिरवतो आहे ना?' अशा विचाराने ते गप्प बसले होते. परंतु जेव्हा तो स्वकीयांना तुच्छ मानून परक्यांना जवळ करू लागला तेव्हा त्यांनी त्याचे बिंग फोडण्याचा बेत केला. त्यानुसार ते कोल्हे एके दिवशी त्या ककुद्रमापासून काही अंतरावर एकत्र जमले व 'कुई कुई' ओरडू लागले. त्याबरोबर वाघ, सिंह आदि बड्या पण परक्या प्राण्यांत राजा म्हणून रुबाबात बसलेल्या ककुद्रमाच्या कानी ती कोल्हेकुई गेली आणि स्वभावधर्मानुसार उभे राहून व तोंड वर करून 'कुईकुई' असे ओरडायला सुरुवात केली.
त्याच्या त्या कोल्हेकुईमुळे त्याचे खरे स्वरूप उघडे होताच, ते त्याची सेवा करणारे बडे पशू एकमेकांना म्हणाले, 'अरे, हा तर एक फालतू कोल्हा आहे ! याने मारलेल्या थापा खर्‍या मानून आपण फसलो व याच्या सेवेत गुंतून गेलो.' याप्रमाणे बोलून क्षणार्धात त्या पशूंनी त्या ककुद्रमालाच ठार केले.
ही गोष्ट पिंगलकाला सांगून दमनक त्याला म्हणाला, 'महाराज, म्हणून तुम्ही त्या ढोंगी व परक्या संजीवकाला जवळ करू नका. मी तर म्हणतो, तुम्ही त्या कपटी गवतखाऊला लवकरात लवकर यमलोकी रवाना करा व निश्चिंत व्हा.'
'पण दमनका, संजीवक हा खरोखरच माझ्या वाईटावर आहे याला पुरावा काय?'
असा प्रश्न पिंगलकाने केला असता दमनक म्हणाला, 'तो माझ्याशी जे बोलतो ते तर मी आपल्याला सांगितलेच. शिवाय त्याचा आपल्याला आजच मारण्याचा विचार दिसतोय. तो चरून जेव्हा आपल्याकडे येईल, तेव्हा आपण त्याच्याकडे बारकाईने पाहा. त्याची चर्या उग्र दिसेल, त्याच्या डोळ्यात लाली व क्रूरता आढळेल आणि त्याच्या नाकपुड्या क्रोधाने थरथरत असल्याचे दिसून येईल. आता एवढे पुरावे मिळाल्यावरही जर आपण त्याला ठार मारले नाही, तर आपण व आपले दैव. मी तरी आपल्याला आणखी किती सावध करणार?'
अशा तर्‍हेने पिंगलकाचे मन संजीवकाविरुद्ध पार कलुषित करून दमनक निघाला. तो बर्‍याच अंतरावर चरत असलेल्या संजीवकाकडे चिंताग्रस्त चेहेर्‍याने गेला. त्याला पाहताच त्याचे सुहास्य मुद्रेने स्वागत करून संजीवक म्हणाला, 'वा ! दमनका, आज माझ्याकडे येऊन तू मला धन्य केलेस. म्हटलंच आहे ना?-
ते धन्यास्ते विवेकज्ञास्ते सभ्या इह भूतले ।
आगच्छन्ति गृहे येषां कार्यार्थं सुह्रदो जनाः ॥
(आपले हेतु सफल करून घेण्याच्या उद्देशाने ज्यांच्या घरी मित्रमंडळी येत राहतात, तेच लोक या जगात धन्य, विवेकी व सभ्य होत.)
याप्रमाणे स्वागत करून संजीवकाने दमनकाला त्याचे क्षेम विचारले असता, दमनक मुद्दाम खिन्नपणे म्हणाला, 'अरे मित्रा, ज्याचे भविष्य सर्वस्वी धन्याच्या मर्जीवर अवलंबून असते, असा सेवक कधी सुखी असतो का? वास्तविक सेवक हा जरी जिवंत असला तरी तो मेल्यातच जमा असतो. म्हटलंच आहे ना ?-
जीवन्तोऽपि मृताः पञ्च श्रूयन्ते किल भारते ।
दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्यसेवकः ॥
(दरिद्री, रोगजर्जर, मूर्ख, प्रवासी व नेहमी सेवेत गुंतलेला, हे पाचजण जिवंत असूनही मेल्यात जमा असल्याचे जे महाभारतात म्हटले गेले आहे ते खरे आहे.)
'शिवाय-
सेवा श्ववृत्तिराख्याता यैस्तैर्मिथ्या प्रजल्पितम् ।
स्वच्छन्दं चरति श्वात्र सेवकः परशासनात् ॥
(सेवावृत्तीला म्हणजे दुसर्‍याच्या नोकरीला जे 'श्वानवृत्ती असं म्हटलं जातं, ते चुकीन म्हटलं जातं. कारण कुत्रा हा निदान स्वतःच्या इच्छेनुसार इकडे तिकडे संचार तरी करू शकतो. पण सेवकाला मात्र दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागावे लागेल.)
संजीवकाने प्रश्न केला, 'अरे, पण तू काय साधासुधा सेवक आहेस ? तू राजसेवक व त्यातून मंत्री आहेस. तेव्हा तुला दुःखी असण्याचं काय कारण ?'
खिन्न स्वरात दमनक म्हणाला, 'बाबा रे, राजसेवक आहे म्हणूनच अधिक दुःखी आहे. राजसेवकाचं दैव राजाच्या लहरीबरोबर उलटंसुलटं होत असतं. तुझीच गोष्ट घे ना ! कालपर्यंत तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारे महाराज, तुझा काही एक अपराध नसता, आज तुला जिवे मारायला तयार व्हावे, हा काय न्याय झाला ?'
दमनकाच्या या विधानामुळे पार हादरून जाऊन संजीवकाने विचारले, 'काय म्हणतोस काय दमनका? महाराज मला जिवे मारणार आहेत ? आणि ते का ?'
दमनक म्हणाला, 'अरे, राजाने व पावसाने झोडपले तर कारण विचारायचे असते का ? त्यांची लहर हेच त्याचे कारण. 'आपण संजीवकाला मारून, आपल्या सर्व परिवाराला मेजवानी देणार आहोत, 'असं ते नुकतेच मला म्हणाले, म्हणून तुला सांगावयास आलो. वास्तविक राजाने विश्वासात घेऊन सांगितलेली गोष्ट मंत्र्याने बाहेर फोडणे हे पाप आहे. धर्मशास्त्रच मुळी असं सांगत की-
यो मन्त्रं स्वामिनो भिन्द्यात्साचिव्ये सन्नियोजितः ।
स हत्वा नृपकार्यं तत्‌ स्वयं च नरकं व्रजेत् ॥
(जो मंत्री धन्याचे म्हणजे राजाचे रहस्य बाहेर फोडतो, तो त्या राजाच्या कार्याची तर हानी करतोच, पण त्यायोगे स्वतःही नरकात जातो.)
'तेव्हा मित्रा संजीवका, वास्तविक हे गुपित मी तुला सांगायलाच नको होतं पण केवळ माझ्यावर विश्वास ठेवून तू पिंगलकमहाराजांकडे गेलास व त्यांचा मित्र बनलास म्हणून तुझ्यावर आलेल्या प्राणसंकटाची तुला कल्पना देणे हे मी माझे अधिक श्रेष्ठ कर्तव्य मानले व ते गुपित तुझ्यापाशी उघड केले.'
'पण पिंगलकमहाराजांच्या डोक्यात आलेला हा घातक विचार त्यांनी काढून टाकावा यासाठी तू त्यांना काही सांगून पाहिले नाहीस का?' असा प्रश्न संजीवकाने केला असता कपटी दमनक त्याला साळसूदपणे म्हणाला, 'मी सर्व तर्‍हेने प्रयत्‍न केले, पण ते मला म्हणू लागले, 'अरे दमनका, तो संजीवक हा काही झाले तरी गवतखाऊ आणि आपण मांसाहारी. तेव्हा त्याच्याशी मैत्री ठेवण्याऐवजी त्याला शत्रु मानणे, हेच शहाणपणाचे नाही का? आणि शत्रु म्हटला म्हणजे, त्याला जरी स्वतःची मुलगी दिलेली असली तरी त्याचा निःपात करणे हे माझ्यासारख्या क्षत्रियाचे कर्तव्य आहे.' पिंगलकमहाराज असे बोलल्यावर माझे काय चालणार?'
संजीवक म्हणाला, 'एका अर्थी पिंगलकाचं म्हणण खरं आहे. त्याच्याशी मी मैत्री केली ही माझीच चूक झाली. म्हटलेच आहे ना?
ययोरेव समं वित्तं ययोरेव समं कुलम्‍ ।
तयोर्मैत्री विवाहश्च न तु पुष्टविपुष्ट्योः ॥
(ज्यांची आर्थिक परिस्थिती सारखी असते व ज्यांचे कुल तोलामोलाचे असते त्यांच्यातच मैत्री व विवाह जुळून येतात, विषमांत जुळून येत नाहीत.)
यावर संभावितपणाचा आव आणून दमनकाने विचारले, 'संजीवका, तूच एकदा तुझ्या प्रभावी वाणीने महाराजांचा तुझ्याबद्दलचा राग घालवून टाकण्याचा प्रयत्‍न का करीत नाहीस ?'
हताशपणे संजीवक म्हणाला 'दमनका, त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण-
निमित्तमुद्दिश्य हि यः प्रकुप्यति ।
ध्रुवं स तस्यापगमे प्रशाम्यति ।
अकारणद्वेषपरो हि यो भवेत् ।
कथं नरस्तं परितोषयिष्यति ॥
(जो काही कारणास्तव रागावतो, तो ते कारण दूर केले की लगेच शांत होतो. पण जो काहीएक कारण नसताना द्वेष करतो वा रागावतो-अशा पुरुषाचे समाधान कसे करायचे ?)
'तेव्हा दमनका, एकतर मी त्या पिंगलकाचे मन वळविण्याचा कितीही प्रयत्‍न केला तरी ते वळणार नाही आणि दुसरे म्हणजे समजा, त्याचे मन यदाकदाचित वळले, तरी ज्याप्रमाणे त्या क्रथनक नावाच्या सज्जन उंटाचा त्या कपटी कावळा, कोल्हा आदि त्याच्याच सहकार्‍यांनी बळी घेतला, त्याचप्रमाणे पिंगलकाचे कान फुंकणारे 'पापग्रह' आज ना उद्या माझाही बळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.'
'बळी घेतल्या गेलेल्या त्या क्रथनक उंटाची गोष्ट काय आहे ?' अशी पृच्छा दमनकाने केली असता संजीवक म्हणाला, 'ऐक-

गोष्ट अकरावी
'दुष्टांचे बोलणे असे गोडे, पण त्यावर भाळणारा फशी पडे.'
एका वनात 'मदोत्कट' नावाचा एक सिंह राहात होता. त्याच्या अनुयायांमध्ये चित्ता, कोल्हा व एक कावळा हे तिघे प्रमुख होते.
एकदा आपल्या अनुयायांसह तो मदोत्कट सिंह वनात फिरत असता, त्याला एक उंट दिसला. तो उंट मूळ तांड्यापासून अलग पडून, भटकत भटकत, चुकून त्या वनात आला होता. मदोत्कटाने त्यापूर्वी कधीही उंट पाहिलेला नसल्याने त्याने विचारले, 'हा प्राणी कोण आहे आणि हा वनातच राहातो, की लोकांच्या आधाराने गावात राहतो?'
कावळा म्हणाला, 'महाराज, याला उंट असे म्हणतात. हा माणसांत राहातो व त्यांची ओझी वाहण्याची कामे करतो. याचे मांस फार रुचकर असते. आपण याला मारलेत, तर तीन-चार दिवस आपली सर्वांचीच चंगळ उडेल.'
मदोत्कट म्हणाला, 'कावळोबा, तुम्हाला खाण्याशिवाय दुसरे काहीच सुचत नाही का ? वास्तविक, तो त्याचे भाईबंद सोडून आपल्याकडे आलेला आहे, तेव्हा त्याला अभय देणे, हे आपले पवित्र कर्तव्य आहे. म्हटलंच आहे ना?-
न गोप्रदानं न महीप्रदानं न चान्नदानं हि तथा प्रधानम् ।
यथा वदन्तीह बुधाः प्रधानं सर्वप्रदानेष्वभयप्रदानम् ॥
(गाईचे दान नव्हे, भूमीचे दान नव्हे, किंवा अन्नदानही तेवढे महत्त्वाचे नव्हे, एवढे अभयदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे, असे सूज्ञ म्हणतात.)
खुद्द मदोत्कटच असे म्हणाल्यामुळे कावळा, कोल्हा व चित्ता हे तिघेही गप्प बसले आणि मदोत्कटाच्या आज्ञेवरून ते त्या उंटाला घेऊन त्याच्याकडे आहे. मदोत्कटाने त्या उंटाची आस्थेने चौकशी करून त्याला अभय दिले व आपल्या परिवारात सामील करून घेतले. मग तो क्रथनक नावाचा उंट त्या रानात उगवलेल्या पाचूसारख्या गवतावर आपला उदरनिर्वाह मोठ्या सुखात करू लागला. पण, या उंटाला मारून त्याच्या रुचकर मांसाचा आस्वाद घेण्याऐवजी, आपल्या वनराजाने त्याला अभय दिले, ही गोष्ट कावळा, कोल्हा व चित्ता यांच्या मनात सलत राहिली.
एके दिवशी त्या मदोत्कट सिंहाची, त्याच वनातील एका उन्मत्त हत्तीशी झुंज झाली, आणि तीत त्या हत्तीचा सुळा लागून, मदोत्कटाला जबर जखम झाली. त्यामुळे आजारी पडून, त्याच्यावर गुहेत पडून राहाण्याची पाळी आली.
मदोत्कटाचे शिकारीसाठी बाहेर जाणे बंद झाल्यामुळे, त्याच्याबरोबरच त्याच्या परिवारातील चित्ता, कोल्हा व कावळा आदि पशुपक्ष्यांची उपासमार होऊ लागली. अशा स्थितीत एकदा मदोत्कट त्यांना म्हणाला, 'बाबांनो, सध्या मला काही शिकारीसाठी बाहेर पडता येत नाही. तेव्हा तुम्ही जर एखाद्या प्राण्याला फसवून माझ्या गुहेत आणलेत, तर इथल्या इथे मी त्याची शिकार करीन आणि माझ्या भुकेबरोबरच तुमचीही भूक भागवीन.'
मदोत्कटाने याप्रमाणे सांगताच, चित्ता, कोल्हा व कावळा हे तिघेही तिथून निघून वनात गेले व श्वापदाचा शोध घेऊ लागले. बराच प्रयत्‍न करूनदेखील 'शिकार' दृष्टिपथात न आल्याने कोल्हा आपल्या दोघा साथीदारांना म्हणाला, 'उंटासारखा चवदार प्राणी हाताशी असताना, महाराज त्यालाच का मारीत नाहीत ? त्याला मारले असते, तर चार-दोन दिवस त्याचे मांस आपल्याला पोटीपोटभर झाले असते.'
कावळा म्हणाला, 'मलाही तसेच वाटते. पण महाराज पडले धार्मिक. तेव्हा अभय दिलेल्या त्याला ते कसे मारतील ?'
कोल्हा बोलू लागला, 'हे पहा, जे स्वतःला 'धार्मिक' म्हणवून घेतात ना, ते स्वतःच्या सोयीचे असे धर्मग्रंथातले आधार घेऊन, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांप्रमाणेच मनःपूत वागत असतात. तेव्हा मी एकटाच महाराजांकडे जातो आणि धर्मातले आधार देऊनच त्या उंटाला मारण्याबाबत त्यांची संमती मिळवतो.'
चित्ता व कावळा यांना असे आश्वासन देऊन व त्यांना ते होते त्याच ठिकाणी थांबायला सांगून, तो कपटी कोल्हा मदोत्कटाकडे मंदगतीने गेला व त्याला म्हणाला, 'महाराज, आम्ही तिघांनी शोध घेऊनही आम्हाला शिकार मिळाली नाही आणि भुकेने शक्तिहीन झाल्यामुळे शिकारीच्या शोधार्थ आणखी भटकण्याएवढे आता आमच्या अंगात त्राणही राहिले नाही. अशा स्थितीत आपण त्या निरुपयोगी क्रथनक उंटालाच मारून खाल्ले तर?'
मदोत्कट म्हणाला, 'अरे नीचा, काय बोलतोस तू हे ? ज्याला मी अभय दिले आहे, त्यालाच मी मारून खाऊ ? धर्माच्या विरुद्ध अशी ही गोष्ट मी कदापीही करणार नाही.'
कोल्हा बोलू लागला, 'महाराज, आपल्यासारख्या धर्मवीराला मी अधार्मिक कृत्य करायला कसा सांगेन ? पण समजा, महाराजांचे भुकेमुळे जाऊ पाहणारे प्राण वाचविण्यासाठी जर त्या स्वामीभक्त क्रथनकानेच प्राणार्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याची इच्छा जर चित्त्याने व मी पूर्ण करण्यात मदत केली, तर आपण त्या क्रथनकाचे मांस खाल ना ? कारण त्यामुळे क्रथनकासारख्या निष्ठावंत सेवकाची पवित्र इच्छा पूर्ण केल्याचे धर्मकृत्य आपल्या हातून घडेल आणि धन्याचे प्राण वाचविण्यासाठी प्राणार्पण करण्याचे धर्मकृत्य त्या क्रथनकाकडून घडल्यामुळे, त्यालाही मरणोत्तर स्वर्ग मिळेल.'
भुकेल्या मदोत्कटाने उत्तर दिले, 'हा तुमचा मार्ग धर्माला धरून असल्याने, मी त्याचे मांस आनंदाने खाईन. कुणीकडून तरी क्रथनकाला मरणोत्तर स्वर्ग मिळावा अशीच माझी इच्छा आहे.'
मदोत्कटाने तशी तयारी दाखविताच, त्या पाताळयंत्री कोल्ह्याच्या पायात जोर आला. तो वेगाने आपले सहकारी कावळा व चित्ता यांच्याकडे गेला व त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला. मग ते तिघेही दूरवरच्या एका कुरणात चरत असलेल्या क्रथनकाकडे गेले.
तिथे जाताच कोल्हा त्या उंटाला म्हणाला, 'मित्रा, भुकेने व्याकुळ झालेले मदोत्कटमहाराज अखेरच्या घटका मोजत आहेत. अशा वेळी आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना, 'तुम्ही आम्हाला मारून खा, पण तुमचे प्राण वाचवा,' असे सांगितले पाहिजे. मदोत्कटमहाराज आपल्याला मारून खाणे शक्य नाही. तेव्हा त्यांना नुसते तसे सांगायला काय हरकत आहे ? म्हणून आपण चौघेही त्यांच्याकडे आताच जाऊ या.' तो कोल्हा याप्रमाणे बोलल्यावर तो स्वतः, कावळा व उंट असे चौघेही मदोत्कटाकडे गेले व त्याला नमस्कार करून उभे राहिले.
मग तो कावळ मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, गेल्या तीन-चार दिवसांत पोटात मांसाचा कणही न गेल्याने, आपले प्राण जाण्याची पाळी आली आहे. अशा स्थितीत आपण मागेपुढे न पाहता निःशंकपणे मला मारून खावे व स्वतःचे प्राण वाचवावे. त्यात माझेही हित आहे. कारण-
स्वाम्यर्थे यस्त्यजेत् प्राणान् भृत्यो भक्तिसमन्वितः ।
परं स पदमाप्नोति जरामरणवर्जितम् ॥
(भक्तियुक्त मनाने जो सेवक स्वामीसाठी आपले प्राण देतो, त्याला वृद्धत्व व मृत्यु यांच्यापासून मुक्त अशा अढळपदाचा लाभ होतो.)
त्या कावळ्याचे हे बोलणे पूर्ण होते न होते, तोच त्याला बाजूला सारून कोल्हा त्या सिंहाला म्हणाला, 'महाराज, या कावळ्याला खाऊन आपले पोट कसे काय भरणार ? तेव्हा आपण मलाच मारून खावे व माझे जीवन धन्य करावे.'
मग त्या कोल्ह्याशी मागे ढकलून चित्ता पुढे व मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, या कावळ्याला खाऊन आपल्या पोटात कोकलत असलेले भुकेचे कावळे काही तृप्त होणार नाहीत आणि आपल्याप्रमाणेच नख्यांनी शिकार करणारा हा कोल्हा आपल्याच संस्कृतीचा असल्याने, याला आपण मारून खाणेही योग्य नाही. तेव्हा आपण मलाच मारून खावे आणि योग्यांनाही मरणोत्तर जी गती मिळत नाही, ती गती मिळण्याची संधी देऊन मला धन्य करावे.'
कावळा, कोल्हा व चित्ता यांनी प्राणार्पण करण्याची तयारी दर्शविली असतानाही मदोत्कटाने त्यांना मारून खाल्ले नाही; मग मला तर अभय दिले असल्याने, तो मारणे शक्य नाही, अशी समजूत होऊन क्रथनक उंटही पुढे सरसावला व मदोत्कटाला म्हणाला, 'महाराज, चित्ता हासुद्धा आपल्याप्रमाणेच नख्यांनी शिकार करणारा असल्याने, तो आपल्याच संस्कृतीतला आहे. तेव्हा त्याला न मारता, आपण मलाच मारून खावे व मला मरणोत्तर उत्तम गतीचा धनी करावे.' क्रथनक याप्रमाणे बोलताच, कोल्हा व चित्ता यांनी त्याच्यावर झडप घेऊन त्याला ठार मारले आणि मग मदोत्कटासह त्या सर्वांनी त्याचे मांस अगदी चवीने खाल्ले...''
ही गोष्ट सांगून संजीवक दमनकाला मारले, 'तेव्हा मित्रा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी मी त्या पिंगलकाची समजूत घालून, त्याच्या मनात माझ्याविषयी निर्माण झालेला गैरसमज दूर केला, तरी त्याच्याभोवती वावरणारे दुष्ट सल्लागार त्याचे मन पुन्हा कोणत्याही रीतीने कलुषित करतील व माझा घात करतील. त्यामुळे पिंगलकाशी पुन्हा स्नेहसंबंधी जोडण्यात अर्थ नाही. कारण म्हटलंच आहे. -
गृध्राकारोऽपि सेव्यः स्यात्‍ हंसाकारैः सभासदैः
हंसाकारोपि सन्त्याज्यो गृध्राकारैः स तैर्नृपः ॥
(भोवतालच्या परिवारातील लोक हे जर हंसांप्रमाणे असतील, तर गिधाडाप्रमाणे असलेल्या राजाच्या सेवेत रहावे, पण भोवतालच्या परिवारातील लोक हे जर गिधाडांप्रमाणे असतील, तर हंसाप्रमाणे असलेल्या राजाच्याही सेवेत राहू नये.)
'शिवाय हे दमनका, दुष्टाबद्दल बोलायचं झालं तर तो एक महाभयंकर सर्पच आहे. म्हटलंच आहे ना?-
अहो खलभुजङ्गस्य विपरीतो वधक्रमः ।
कर्णे लगति चैकस्य प्राणैरन्यो वियुज्यते ॥
(अहो, खलरूपी सर्पाची दुसर्‍यांना मारण्याची रीत मोठी अजब असते. तो एकाच्या कानाला दंश करतो. तर दुसर्‍याचा प्राण घेतो.)
ह्या संजीवकाची व पिंगलकाची झुंज सुरू झाली आणि त्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असता, त्यांच्यापैकी एखाद्याने, मी त्याला दुसर्‍याविरुद्ध उठवल्याची गोष्ट उघड केली, तर पिंगलक आपल्याला ठार मारल्याशिवाय राहणार नाही, त्यापेक्षा या संजीवकाला दूरच्या रानात जायला सांगणे अधिक बरे ! असा विचार करून दमनक त्याला म्हणाला, 'संजीवका, मला वाटते तू पिंगलकमहाराजांपासून तुझे रक्षण करण्यासाठी दुसर्‍या एखाद्या वनात निघून जावेस.'
संजीवक म्हणाला, 'नाही दमनका, मी या वनातून दुसर्‍या वनात गेलो, तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही. कारण -
महतां यो‍ऽपराध्येत दूरस्थोंऽस्मीति नाश्वसेत् ।
दीर्घो बुद्धिमतो बाहू ताभ्यां हिंसति हिंसकम् ॥
(थोरामोठ्यांचा ज्याने अपराध केला, त्याने 'आपण दूर आहोत म्हणजे सुरक्षित आहोत, अशा विश्वासावर राहू नये, कारण बुद्धिवंताचे बाहू फार दूरवरपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या सहाय्याने तो अपराध्याला मारू शकतो.)
'तेव्हा दमनका, समजा पिंगलकाशी लढता लढता मला मरण आले, तरी मी ते पत्करीन, पण पळून दुसर्‍या रानात जाणार नाही.'
संजीवकाने पिंगलकाशी लढण्याचा केलेला निर्धार त्याने बदलावा म्हणून दमनक त्याला म्हणाला, 'मित्रा, निर्णय घेण्यात तू अशी उताविळी करू नकोस. ज्याच्याशी आपल्याला लढायचे आहे, त्या शत्रूशी अगोदर ताकद ओळखून, मगच त्याच्याशी लढायचे की नाही, याबद्दलचा निर्णय घ्यावा. नाहीतर त्या टिटव्याकडून पराभूत होण्याचा प्रसंग जसा समुद्रावर आला, तसा प्रसंग तुझ्यावर यायचा.'
'तो कसा काय?' असा प्रश्न संजीवकाने विचारला असता, दमनक सांगू लागला-

गोष्ट बारावी
'जो न ऐके हिताचे बोलणे, त्याच्या नशिबी ठोकरा खाणे !
सागरतीरी टिटवा - टिटवीचे एक जोडपे राहात होते. एकदा टिटवी लाजत मुरकत टिटव्याला म्हणाली, 'ऐकल का ? मला दिवस गेलेत. तेव्हा मला अंडी घालण्याच्या दृष्टीने एखादे सुरक्षित ठिकाण तुम्ही शोधून काढा.'
टिटवा म्हणाला, 'कांते, अगं समुद्रकिनार्‍यासारखं हवेशीर ठिकाण सोडून, अंडी घालण्यासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याचं काय कारणं ? तू या किनार्‍यालगतच्या पुळणीतच अंडी घाल.'
टिटवी म्हणाली, 'पण पुनवेला या समुद्राला नेहमीपेक्षा अधिक भरती आली आणि याच्या लाटांबरोबर याने माझी अंडी वाहून नेली, तर काय करू ?'
टिटवा हसून म्हणाला, 'प्रिये, तुम्हा बायकांची जात अती भित्री. अगं आपल्या अंड्यांना हात लावण्याची त्या समुद्राची काय बिशाद लागते ?'
त्या टिटव्याचे हे बोलणे ऐकून, त्या समुद्राने मुद्दामच टिटवीने अंडी घातल्यावर ती लांबविण्याचे ठरविले. तो मनात म्हणाला, 'ज्या पुरुषांचे तेज घराबाहेरच्या जगात कुठेच पडत नसते, त्यांणा घरात बायकापोरांसमोर पावलोपावली आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करण्याची वाईट खोड असते. तेव्हा निदान या टिटव्याची मिजास उतरविण्यासाठी तरी, या टिटवीची अंडी लांबवायलाच हवीत.'
मग पतीच्या सांगण्यानुसार टिटवीने सागरकिनारीच्या वाळवंटात अंडी घातली, आणि एके दिवशी ती दोघे भक्ष्याच्या शोधार्थ दूरवर गेली असता, समुद्राने पुनवेच्या महाभरतीची संधी साधून, आपल्या लाटांच्या हातांनी ती अंडी लांबविली.
परत आल्यावर जेव्हा आपली अंडी समुद्राने पळवून नेली असल्याचे त्या टिटवीला आढळून आले, तेव्हा आकांत करीत ती टिटव्याला म्हणाली, 'तुम्हाला परोपरीने सांगूनही तुम्ही माझे ऐकले नाही, म्हणून आपल्यावर हा प्रसंग ओढवला. दुसरे लोक हिताचे सांगत असतानाही, जे आपल्याच हेक्यानुसार वागतात, ते काठी सोडल्यामुळे आकाशातून खाली पडून मेलेल्या कासवाप्रमाणे नाश पावतात?'
ती कासवाची गोष्ट काय आहे, 'अशी पृच्छा टिटव्याने केली असता, आपले रडणे तात्पुरते थांबवून टिटवी म्हणाली, 'ऐका-

गोष्ट तेरावी
'प्रसंगाचे भान ठेवावे अन्यथा करून घ्यावे नुकसान.'
एका सरोवरात कंबुग्रीव नावाचे एक कासव राहात होते. त्याच सरोवरात जलविहार करण्यासाठी संकट व विकट या नावचे दोन हंसे येत व अधुनमधून त्या कासवाला देवादिकांच्या बोधप्रद गोष्टी सांगत. संध्याकाळ व्हायला आली; की ते हंस दूरच्या झाडांवर असलेल्या आपल्या घरट्यांकडे निघून जात.
एका वर्षी पाऊस न पडल्याने ते सरोवर आटले. तेव्हा ते हंस त्या कासवाला म्हणाले, 'कंबुग्रीवा, या तळ्यात आता बव्हंशी चिखलच उरला आहे. उद्या हे तळे कोरडे ठणठणीत झाले की, तुझे काय होणार, याची आम्हाला चिंता लागली आहे. आम्ही दोघे पाण्याने तुडुंब भरलेल्या दुसर्‍या एका दूरच्या सरोवराकडे जलविहारासाठी जाऊ शकतो. पण तू कुठे जाणार?'
ते कासव म्हणाले, 'मी कधीही उद्याची चिंता करीत नाही. पण तुम्हीच विषय काढलात म्हणून सांगतो- तुम्ही बेतशीर लांबीची एक काठी घेऊन या. मी त्या काठीचा मध्यभाग माझ्या तोंडात घट्ट पकडतो. मग तुम्ही दोघे त्या काठीचे एकेक टोक तुमच्या चोचीत घट्ट धरा व उडत उडत मला त्या भरपूर पाणी असलेल्या सरोवरात नेऊन सोडा.'
ते हंस म्हणाले, 'कंबुग्रीवा, तू युक्ती तर नामी शोधून काढलीस. पण आम्ही दोघे हवेतून उडत असताना, तू कुठल्याही परिस्थितीत तोंड मात्र उघडू नकोस. नाहीतर उंचावरून जमिनीवर जोरात आदळशील व फुकट मरून जाशील.' यावर ते कासव म्हणाले, 'मित्रांनो, माझी चिंता वहायला मी समर्थ आहे.' मग त्या हंसांनी एक काठी आणली. त्या कासवाने तिला मध्यभागी तोंडात घट्ट पकडली, आणि त्या हंसांपैकी प्रत्येकाने तिचे एकेक टोक चोचीत दाबून धरून आकाशात भरारी घेतली.
अशा तर्‍हेने ते हंस त्या कासवासह हवेतून उडत उडत एका गावावरून चालले असता, त्यांना त्या गावातल्या गावकर्‍यांनी पाहिले व ते गावकरी एकमेकांना विचारू लागले, 'काय हो, ते दोन हंस वाटोळे वाटोळे असे जे काहीतरी घेऊन चालले आहेत, ते काय असेल ?'
ते त्यांचे शब्द कानी पडताच त्या कासवाने, त्या हंसांना, 'मित्रांनो, त्या मूर्ख गावकर्‍यांना, मी कासव आहे ही साधी गोष्टसुद्धा कळू नये?' असे विचारण्याकरिता तोंड उघडले, त्याबरोबर - काठीचा आधार सुटल्यामुळे - ते कासव आकाशातून जमिनीवर कोसळून छिन्नविच्छिन्न झाले.' ही गोष्ट सांगून टिटवी टिटव्याला म्हणाली, 'त्या हंसांनी सांगितलेली हिताची गोष्ट सांगून दुर्लक्षिल्यामुळे त्या कासवाचा असा दारूण शेवट झाला.'
ती टिटवी पुढं म्हणाली, 'उद्याची चिंता आज कशाला करायची ? किंवा 'माझी चिंता वाहायला मी समर्थ आहे,' असे म्हणून बेसावध कधीही राहू नये. तसे बेसावध राहिल्यामुळे व आपले भविष्य नशिबावर सोपविल्यामुळेच त्या 'यद्भविष्य' नावाच्या माशावरती प्राण गमावण्याचा प्रसंग आला.'
'ती गोष्ट काय आहे?' असे त्या टिटव्याने मोठ्या उत्कंठेने विचारले असता, टिटवी म्हणाली, 'नीट ऐका-

गोष्ट चौदावी
नशिबाचे तट्टू पावलास अडे,
तर प्रयत्‍नाचा घोडा चौखूर दौडे.

एका सरोवरात अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती, व यद्भविष्य या नावाचे तीन मासे आपापल्या बंधुबांधवांसह राहात होते. त्यांच्यापैकी 'अनागतविधाता' हा मासा भविष्यकाळात संकट येण्याची शक्यता दिसताच, त्या संकटाऊन सहीसलामत सुटण्याची अगोदरच उपाययोजना करील 'प्रत्युत्पन्नमती' हा - आयत्या वेळी का होईना - युक्ती लढवून, आलेल्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडण्यात यश मिळवी; तर तिसरा 'यद्भविष्य' हा मासा 'नशिबात असेल ते होईल' असे म्हणून स्वस्थ बसून राही.
एके दिवशी संध्याकाळी, काही कोळी, दुसर्‍या एका सरोवरातले मासे पकडून, ते तीन मासे रहात असलेल्या सरोवराच्या काठाने चालले असता, त्यांना ते मासे दिसले. ते पाहून ते कोळी आपापसांत म्हणाले, 'वाः ! केवढे मोठमोठे मासे आहेत या तळ्यात ! सध्या आपल्यापाशी भरपूर मासे असल्याने, व आता अंधारूनही लागले असल्याने, आपण उद्या सकाळी या तळ्याकडे येऊ व इथल्या माशांना पागवून नेऊ.'
कोळ्यांचे ते बोलणे एखाद्या वज्राघातासारखे कानी पडताच, अनागतविधाता मासा त्या सरोवरातल्या माशांना जवळ बोलावून घेऊन म्हणाला, 'ते कोळी जे बोलले ते ऐकालेत ना? तेव्हा आपण सर्वांनी आत्ताच्या आत्ता दुसर्‍या जवळच्या तळ्याच्या आश्रयाला गेले पाहिजे. नाहीतर ते कोळी उद्या सकाळी येतील आणि पाण्यात जाळी टाकून, खाण्यासाठी वा विकण्यासाठी आपणा सर्वांना पकडून नेतील. तेव्हा या संकटातून आपला बचाव करण्यासाठी अगोदरच उपाय योजलेला बरा. म्हटलंच आहे -
अशक्तैर्बलिनः शत्रोः कर्तव्य प्रपलायनम् ।
संश्रितव्योऽथवा दुर्गो नान्या तेषां गतिर्भवेत् ॥
(आपला शत्रु जर प्रबळ असेल, तर अशक्तांनी एक तर पळ काढावा किंवा एखाद्या किल्ल्ल्याचा आश्रय तरी घ्यावा. जीव वाचविण्याचा याशिवाय त्याला अन्य मार्ग नसतो.)
अनागतविधात्याचं हे बोलणं ऐकून प्रत्युत्पन्नमती म्हणाला, 'तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण आजच्या आज इथून त्या दुसर्‍या सरोवरात गेले पाहिजे. आता 'वाडवडील राहात आलेले हे ठिकाण सोडून दुसरीकडे कसे जायचे?' असा विचार आपल्यापैकी एखाद्याच्या मनात येईल, पण त्यात अर्थ नाही. कारण -
यस्यास्ति सर्वत्र गतिः स कस्मात्‍
स्वदेशरागेण हि याति नाशम् ।
तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः
क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति ।
(जो सर्व ठिकाणी - म्हणजे कुठेही - जाउ शकतो, त्याने मायेपोटी स्वदेशात राहून, स्वतःला का म्हणून बरबाद करून घ्यायचे ?' कशीही असली तरी ही वडिलांची विहिर आहे.' असे म्हणणार्‍या क्षुद्र लोकांवर त्या विहिरीचे खारे पाणी पीत राहण्याचा प्रसंग येतो.)
प्रत्युत्पन्नमतीने याप्रमाणे अनागतविधात्याच्या म्हणण्याला दुजोरा देताच यद्भविष्य नावाचा मासा खदखदून हसला व त्यांना म्हणाला, 'हे पहा, ते कोळी' उद्या येऊ' असे जरी म्हणाले असले, तरी नक्की येतीलच असे थोडेच आहे ? त्यातून समजा जरी ते आले तरी जय माशांचे आयुष्य संपत आलेले असेल, तेच त्यांच्या जाळ्यांत सापडणार व मरणार. अशा परिस्थितीत, वाडवडील रहात आलेले हे सरोवर सोडून मी तरी दुसरीकडे जाणार नाही.'
यद्भविष्य माशाचा ते सरोवर सोडून न जाण्याचा निर्धार पाहून अनागतविधाता व प्रत्युत्पन्नमती हे दोन मासे आपापल्य परिवारांसह लगेच दुसर्‍या दिवशी सकाळी त्या पहिल्या सरोवराकडे आले आणि जाळी पाण्यात टाकून, त्यांनी यद्भविष्य व त्याच्याबरोबर राहिलेले मासे पकडून त्यांना घरी नेले आणि मारून खाल्ले. नशिबावर अवलंबून रहाणार्‍यांवर असे दुर्धर प्रसंग ओढवतात.'
टिटवीने ही गोष्ट सांगताच टिटवा म्हणाला, 'प्रिये, तू सांगितलेली ही गोष्ट मला लागू नाही. मी काही नशिबावर विसंबून रहाणारा नाही. मी त्या खोडसाळ समुद्राला कोरडा, शुष्क करण्याचा निर्धार केला आहे.'
टिटवी म्हणाली, 'नाथ, रागाच्या भरात असे तोंडाला येईल ते बरळू नका. कुठे तो समुद्र आणि कुठे आपण यःकश्चित्‌ पक्षी !'
टिटवा म्हणाला, 'लाडके, त्या समुद्राच्या तुलनेत जरी मी लहान असलो, तरी दुर्दम्य उत्साह व उत्कट इच्छाशक्ती यांच्या बळावर ही असाध्य गोष्टही मी करून दाखवीन. आणि चोचीने थेंब थेंब पाणी पिता पिता त्या समुद्राला कोरडा ठणठणीत करून दाखवीन. म्हटलंच आहे ना ?-
हस्ती स्थूलतरः स चाड्‌कुशवशः किं हस्तिमात्रोऽङ्‌कुशः
दीपे प्रज्वलिते प्रणश्यति तमः किं दीपमात्रं तमः ।
वज्रेणापि हताः पतन्ति गिरयः किं वज्रमात्रो गिरिः
तेजो यस्य विराजते स बलवान् स्थूलेषु कः प्रत्ययः ॥
(हत्ती हा आकाराने बराच मोठा असून अंकुशाला वश होतो; वास्तविक हत्ती केवढा मोठा व अंकुश किती लहान ? दीप प्रज्वलित केला असता, अंधाराचा नाश होतो; तसं पाहिलं तर अंधारापुढे दिवा किती लहान ? व्रजाच्या आघाताने पर्वत कोसळतात; तसं पहाता पर्वताच्या आकारापुढे वज्र किती लहान ? तात्पर्य हेच की, ज्याच्या ठिकाणी तेज असते, तोच खरा बलवान. आकारमान हे काही सामर्थ्याचे प्रमाण नव्हे.)
यावर टिटवी म्हणाली, 'ते जरी खरं असलं, तरी ज्या सागरात गंगा, सिंधून यांच्यासारख्या शेकडो नद्या प्रतिक्षणी अमर्याद पाणी टाकत असतात, तो समुद्र पिऊन टाकण्याची प्रतिज्ञा करण्यात काही अर्थ आहे का? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या लहानसान का असेनात - बर्‍याच मित्रांना आपल्या सहाय्यार्थ बोलवा आणि त्या समुद्राला धडा शिकवा. कारण बारीकसारीक गोष्टी एकेकट्या जरी कुचकामी ठरत असल्या, तरी जर का त्या एकत्र आल्या, तर त्यांचे संघटित सामर्थ्य, असाध्य वाटणारी गोष्टही साध्य करू शकते. म्हटलंच आहे ना ?-
बहूनामप्यसाराणां समवायो हि दुर्जयः ।
तृणैरावेष्ट्यते रञ्जुर्यया नागोऽपि बद्ध्यते ॥
(कमकुवत का असेनात, त्या गोष्टींचा मोठा समूह झाला की, त्यांना जिंकणे कठीण जाते. म्हणून तर गवताच्या काड्यांपासून बनविलेल्या दोरीने हत्तीलासुद्धा बांधून ठेवता येते.)
टिटवी पुढं म्हणाली, 'नाथ, म्हणूनच एक चिमणी, सुतारपक्षी, बेडूक व माशी यांच्यासारखे यःकश्चित्‌ प्राणी संघटितपणे एका उन्मत्त हत्तीच्या विरुद्ध गेल्यामुळे त्यांना त्या हत्तीचा नाश करता आला ना?'
'तो कसा काय ?' असा प्रश्न टिटव्याने विचारला असता टिटवी सांगू लागली-










Mitrbed Part - 1

Sending money is on all levels, Dnavina life is in vain

Vishnusharma the true three Rajkumaranna Mhnala, "You are far Warshapurvi Rahat reached or Mahilaropy Nagrat 'Vardhamanaka' Nawacha is a Vashyputr Rahat. AK night including its Manat consider the Anthrunat Padla Asata Lagle Yeu, you will Kmtrta Pashanchi Brocade northern ethnic, meaning exists or is in the works Mannyat Snpttit solution? Mhtlnc This is not it?

Nor is there Tdvidyte not Siddhyti Kinchidydrthen.

Ytnen Prasadyet Mtimanstsmadrthamekan.

(J Pashanehi Unable practicable, Ase or Jagat None. It is therefore able Buddhiwantane Only Pasac Milawawa In by.)
This is strength or wanton Pashat Kevdn?

Bandhwaः Yshyarthastsy Ysyarthaastsy Mitrani.

L l f Pndita Pumanlloke Ysyarthaaः Ysyarthaaः.


(Jyacyakde money Tyala Friends discontinuous switching, switching Tyala Natewaik Milatat Jyacyapashi money, money switching Jyachyajvla Toc Toc or switching money Jagat Jyacyakde learned it and is therefore best male Manla Jato Jato Smjla.)
Same as -

Ah uh Dninan Propi Swajnaite Locke.

Swajnopi Dridranan Durjnaite ever.

(Or Jagat Prke Asle rich folk brocade, zari embroidery Dridrai them with it and get Your Manle Your Natewaik Asle, White Understand them with gravy are Lotle away.) Tsec-

Pujyte Ydpujyopi Gmyte Ydgmyopi.

Vndyte Ydvndyopi Dnsy Prbavo f c.

(Man Apujniy firearm with an rich northern keep its worship are Kelly. Jyacyakde go Chukunhi new, Asa Brocade qualified Trte the firearm northern Tyacyakde Jane, and it has a vision Kitihi Krnyacya invocation invocation Tyala northern banana firearm are ineligible.) Except -

Gtwysampi Punsan Trunaः Yeshamrtha Bvnti te.

The henna Vriddhaste Arthen Yuvnepi Syuः ye.

(This is Jyancyapashi wealth ashi Wagtat Trunnasarki Manse, anyway te level Vriddhansarke Asle Wagtat impoverished young.)
The asset Kontya Gage ti-Henyey Get it? Due Total assets Get them suffered route is best.

1) charity Magne
2) Rajachi Service
3) Seti,
4) Vidyadan
5) Savkari,
6) business.

Get the O Lajirwane Bik Tyapaki Magun wealth individuals. White Nsate Tshi Rajachi service, will keep its stake Shaswati Kewha Nsate Firel petitioner. Seti not Piknn Piknn, O Srwswi Pavsacya Asatn Lhrivr belong. Changle Vidyadan complexity, some to their Ichcela J. Gage will be a student so Gurula Aslyane Date, the true Alpswlp Utpnnavar Gurula Lagte Your lifemanship often Galvave Daridrayatc. Savkarit Srirala decrease pain, Gage Savkaracha money borrowed it and is therefore the true Hrinkone Dusrhyacya Jato elephant God banana hands, Dnko Jato Budun cross. Hat Srwat perfect vision of the true business. Tyatun Ithlya Viknyacha Anun Ithe existing Bahergavi and Bahergavcya existing business level Faydeshir Farc.

This idea Yetac Manat, the true Vrdhmanane build on your Gavat Mthures Honarhya object, and Mthures ready for your Gavi existing Honarhya Trvile Viknyache Anun. Both bulls on your Gadila Sanjivk and Nandk Nawache Tyapramane Junpun, all Brun Gadit Vikavyacha goods, and associate the two or three servants Geun Lagla Njikcya Margala good Muhurtavar Mthurecya.
Watet Laglelya Wahnarhya Vnatun Gndat Challi Yamuna Ndichya Katakatane cart Asata, liniment Junplelya Murglala Sanjivk Bailacha pie. Walking forward Tyala turned Impossible. Sevkanna both it and the true Bailacya Tevle for service asks for your mug Vrdhmanane Jvlacyac Unison Unison Gavatun buy new bull Gadila Junple Tyala Geun, and Urlelya Sevcash Mthures Tyane march bananas.

Both days the true servant Jemtem Sanjivk Tyane both backward Tevlele Rahile Preparing Bailachi service, noting "This is Dokyache Wagh-Sinhani Brlelya or Arnyat Rahne, 'In by Asa idea, te servant, the true Bailala Tsac Gayle and Tyala Khotec Mthures Gatnyakrita Dnyala Mhnale Except,' Rich , Your Sanjivk Kailaswasi welded bull. Your excessive Ladka Aslyane then, Amhi Tyala Agni give lawful. "But pure air, Pani it and Grass Milaalhyamulae Pacusarkha Kovlae Hirvegar, welded and Ikde Tikde Sanjivk Thodyac these days Firu Lagla full jumbo. Dshtpusht reached all its Prkritihi Changli. Mhtlnc This is not it? -

Arkshitn Tishtti Vinshyti Davhtn Surkshitn Davrkshitn.

Jiwatyanathopi Vne Vinshyti Grihe Kritprytnopi Visrgita.

(Dawanec Jyache protection has been turned, with an Brocade Rkshnrhit Asa firearm, northern Jyachyavar safe Rahto it and wants Ultle Davc, Asa Rkshnat issued firearm with an Kitihi Pawato northern perish. Tsec Vnat Dilela Except lively creature with an orphan Sharth Rahto attempts on it and is therefore the Jgava Asate, Asa Grat containing Maroon Jato Man!)

Some day you'd Daily Trhhene Nigun transmitted Gelyanantr Vnacha King Pinglk Singh AK Pani Pinyasati Ymunatiri Challa Asata ha, including its little finger Sanjivk Bailachi Pdli Durkalai. Pinglkane Ayushyat bull Pahilela Nslyane curry, or keep its Derkalaihi Aekleli Nslyane, the voice not hesitate Pitac Durcya Pdtac upon the Gabrla and Pani Aplyabhowati Bundyapashi Vdacya Geun In by Kondalae Bsla Mntryanche and Anuyayanche guardian.

Pinglk Sinhacya Mulge Akekalacya minister are both present in unison Kolhyala Krtk and Dmnk Nawache. After Te Pityacya Dogehi are Bnle Pinglkache minister, Gage Pinglkane them with - some Karnastw - Mntreepdavrun be removed. Ymunevr Gelela Your King, ha Pani Vtvricshakde layer Mnasthitit Gelyache not afraid Pitac Mhnala Pahun Krtkala Dmnk 'grandfather, Pinglkmaharaj Pani Brn not wise to Mnasthitit Pitac eerie? You have to Yeta In by inquiries at them? "
Krtk Mhnala, 'Baba Ray, You have Kshala Nstya Utatevi Hwyat? Krwatine Ardhavt Pacr Tokleli Sutaranni the NSTA Kadayla Kaplelya Gelelya Lakdat reached the true Wanrachi previous work, it is not bent Tauk wants? "
"TI is in Gosht work? 'Ase Dmnkane Lagla Vichartac Krtk not tell. . .

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Mitrbed Part - 2

"Nsati Utatev the curry, then Snktala Apnhun Pachari '
"Unison is Nagrat Backing Simevril Upvnat Bandhun a crust temple. Watching the true Kamavar carpenter, etc. Gwandi worker, Sun Dokyavar Yetac At home Xavayla born Apaplya stop it work.

Once the true Mndiracya Tulaya create a Jad and Long Lakud Krwatine Cirt Krnyakrita are Arjunvricshache carpenter. There are no te Cirun Ardhavt Lakud, Toc them the true carpenter Ardhavt Ubavlhyamulae Tokun Cirlelya Pacr Lakdat Karachi, other Kamgaransnge Xavayla has gone home. Quick te it and gone home the true five-Twenty five Wanranche Tikani a Tolake Trhhecya try Nana Yeun, Chalae Lagle do.

Kuni Dgdancya Fektoy Dgd Rashitle, Hatodyane Taktok level Krtoy Kuni, Ase Tyanche Asata Chalae turned on, a Jadgela ape Nsate Updwyap containing it to be the true Ardhavt Cirlelya Lakdavar Khod Bsla Jaune, and the true Cirlelya Bagat remove Sutarane Tokleli Lagla Odun Pacr. Ase Asata to turn, keep its Septi, testis, etc. you'd Ajanta Components Total Dubnglelya Woody Ftit collected it and immediately both parts ti Pacr Alyane Lakdache Tyant Te Te is removed element Jatac Cirdle Mukave Prananna Soshit Lagle Gayle and Tyala torture. M is therefore Mhnto, 'Oh Dmnka, you Utatevit Nstya Nkos costly. "

Yawar Dmnk Murdun Mhnala nose, "Grandpa, you are working mug pot Brnyatc Galvaychan Swtachan only lifemanship Apln Pudln? Good good! You have issued today Rajasry Nsla, Tri Buddies Rajasry again Milavlac You should be between God Ddpnyakrita Annyakrita and Strunna empty. This is for your sense of something proper Ayushyala Sdyacya Catnyhin? Mhtlnc This is not it?

Yasmine Jiwati Sotr Bhvः Jiwati Jivnti.

Wayamsi not Kirwnti Chancwa Swodrpurnm films.
(Jyacya Jagnhyamulae or Jagat Jagtat many users, Toc Krhya Jagto bier. Else Kavlaesuddha Brtatc tossing in your Chochine Own it?)

"When the grandfather, Pinglkmaharajankde m about to go to their Bitiche them with it and cause the Vicharun and potential Jalyas te In by far, their relationship and in your Duravlele Jodnar again." Krtkane Vicharle, "Gage Dmnka, which Nsatanahi Bolavle Rajakde Jato, the Brhyac Kucheshtecha subject Itrancya switching times, O bent Tauk This is not it?"

Dmnk Mhnala 'grandfather, Te Ayushybr Rahtat Nstya Abhimanala Ardhpoti Blai Rahtat Pdun J Public Rajapasun away. Where to Malay Prwatakerij Itrtr not Wadt Jyapramane Chandnvriksh ha, the same as scholar, Gunwan, artiste and courageous thing Rajacya Asryakerij Unable Gunanche Yancya. Thoughtful comes to you, as soon as you are Large Ahot Where to? You bet Brocade common Aslo, anyway Rajacya deserves Asryala. This is due not Mhtlec?

Asnnmev Mnushyn Nriptirbjte.

Vidyavihinmkulinmsnskritn wa.

Prayen Bhumiptyः Ltashc pramada.

Ytparshwato Ttpriveshtynti bhavat.
(Which corresponds Jvlapas man, the Brocade ignorant, ignoble or vulgar firearm, Northern King Tyachyavar There will be pleased. Raje, which is often close to or switching Tyachac Stria and depending Getat Valley.)

This dirty Pinglkakde list by Gela and Tyala Mdn Yapramane Tyacyapude Bolun Nmrpne Dmnk Rahila Uba, when the Pinglkane Tyala Vicharle, "Ray Dmnka work, you work Brhyac Nahis Divsant Majyakde Firkla tight? 'Dmnk Mhnala, "Sir, you will not Urli thunder Samanyanchi Amcyasarkya are cap, level Kshala Ugac Exit? Only certain betting Gosht - You Ask Amhala or not Ask, Amche Aplyavarche lack curry Whayche not love, it and Amhala J. Random Te Aplyasmor Bolayla Amhi Kcrnarhi not qualified. ""Tyatun chef, king delights are cap welded Sevkavar, saturate the far north Deto Tyala Kmiadik wealth, are cap retainer Nishtawant gage welded pleased Rajavr, saturate the overlaps created Tyacyasati Your Pranhi Dyayla. Me and My Bhau Krtk Tulnet Mntryancya You have come off appears to Yःkshcit Aslo, anyway You Gyave My Mhnne Aekun. "

"Sir, do ignore new Yःkshcit Goshtinkdesuddha. SUBJECT Wattat Nsatat Tyasuddha useless. Sadya Kadichasuddha Hotoc use tooth and ear Kornyasati right? Kidyanpasunc Yःkshcit very precious to me Milate Reshim right? Mstki know, the people holding direct Devsuddha Krtat, ti Kmlae Milatat Ciklapasunc right? Sonesuddha Dgd Matitunc not get? Kula or senses when the Bhowatalcya Lokanche Nusate not Vicharat Geta, Their Nishtac to buy the more Vicharat. When the, Amha Dogan Sevkc Bawansarke You have limited useful Pdtil Nishteche inordinate Buddhiche Gage, the Gosht Maharajanni Allow Lcshat differ, Avdich My request is on, you have. "

Pinglk Mhnala Hsun, "Dmnka, you Mulai Bolnec Atache Buddhicha Nahis O thou prove general. My Akekalacya Mntryache Krtk O thou and Tuja Bhau Tyatun Mulge, when the M Tumha Doganna Manin tightly as soon as Prke? Gage or other Goshti you'd Gdeela Tewoon loop, you Ahes Majyakde Kshasati niche, Tevdec rubbed Song. "Dmnk Mhnala, "Some Goshti Srwansmksh Nsatat Bolaycya." Watching all the creature off my speech Aekun King Pinglkabhowati Jatac Tyache Vicharle Dmnkane, "Sir, You Used Pani Pinyacya Ymunakati Uddeshane Asata, Pani Pitac Kahisha not afraid of Ikde Prtlat Mnasthitit? '
Suruwateela Thodese King Pinglk Mhnala Adevede Geun, "Dmnka, m is in Sangto Where to keep its Nkos Wachyta do. Oh, M. Gallo Asata Pyayla Ymunevr Pani, Kalajacha Thrkap Udwnari Pdli a Derkalai My little finger. Aekun ti, ti to an, Mahabynkr Pranyachi should be later, not Pani Pitac Ikde Prtlo Ase Me and my groin Watun to an Alternate Dusrhya do'm considering Durcya Ranat Laglo Janycha. "

Yawar Dmnk Mhnala, "Sir, is not worthy of Jane Dhastawoon Avajamulae Nustya Mass. Wallpaper bigger voice Nagara, led Yanchahi overlaps or shellfish. Unison Unison Amachya Byaylelya Ashac Jatbaiche Naga-Yacya Awajala, then tightly Eye opened, you will Gosht ti of Tauk wants? "Not Pinglkane North Detac Dmnk Mhnala Ase, 'Listen level chef mug. . .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  Mitrbed Part - 3

"Tithe Bhito emails, then I answer Hse In by."
Gomayu Nawacha Bhatkt Vnat Sodartha a Kolha Bkshyacya Asata, including its little finger Adhunmdhun costly Lagla an awful voice. The situation is directly Ashi, AK Tikani Kunacyatri Gelelya Naga-Yawar wa-Yacya Jhulakesrshi Rahun Jhudpacya Unison is happening and therefore can blow Fandicha Adhunmdhun the true message from the Nagas 'Dhaddhum' Out Pdt Asa is sound.
If the voice Aekun Gage Kolha Lagla do consider excessive Gabrla and Te forest Except Janyacha. But Quick including its Manat niche idea, huh fierce creature is in the northern angle Kadnara voice, Te Agodr Antravrun Pahowe safe, not of it and Go Except Mgc o te Trwave forest.

In by Asa idea then just forward the true Avajacya Rokhane Manat not Jato Jato, the Nagara arrived Toc Tyala Krnara Fandichya Agatanmulae voice. Yetac Lcshat an inanimate object from ti Aslyache, then the true Naga-Yajvla Used and Swtashic Mhnala, Ugac or Awajala Byaylo m. Asun kit Pokla Lakdi O, O Most Cmcmit Kadypdarthaanni Asave Brlele, Mhnunc Yache Tond Vrche Asave Chamdyane Takle In by closing fast.

Or enjoy Vicharamulae Tyala welded it and the true substance Khanyacya Hetune Ruckr Bandyatil Te, the true Naga-Yache Katde Datane Tyane Kurtdle and then whoever is working programs including its beginning Lagla various attachments as well. Only Pahto level gage Poklai beginning! If so it Swtashi Mhnala Jalela disappointed -

Those gone or if yo Snprapte Vimrshyet or Hershey.

No comments:

Post a Comment

Effective Home Remedies for Migraine Relief

Introduction: Migraine headaches are characterized by intense, throbbing pain, often accompanied by nausea, sensitivity to light and sound, ...